हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन कार्यकर्त्यांची मागणी
बेळगाव : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर व के. एस. भागवान यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी जे विधान केले आहे ते मागे घ्यावे, या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी भगवान श्रीरामबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे हिंदूमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा मंत्र्यांवर तातडीने कारवाई करून अटक व्हावी, अशी मागणीही हिंदू कार्यकर्त्यांनी केली आहे. शिवाय हिंदुस्थानातील हिंदू धर्मावर होणारे हल्ले कधीही खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वीदेखील सूडबुद्धीने हिंदू धर्मस्थळांची विटंबना झाली आहे. मात्र हे आता खपवून घेतले जाणार नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू धर्मस्थळांची विटंबना करणाऱ्याविरोधात समाजात रोष व्यक्त केला जात आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीराम व सीतामाईंबाबत वादग्रस्त विधान केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा मंत्र्यांवर कारवाई करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तत्काळ अटक करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.