वकीलांना ‘कागदपत्रे’ न्यायालयात सादर न करण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे घटनापीठ आता ‘हरित‘ (पर्यावरणस्नेही) होणार आहे. या घटनापीठासमोर प्रकरण चालविणाऱया विधीज्ञांनी कागदी फायली, प्रत्यक्ष कागदपत्रे किंवा कागद न्यायालयासमोर सादर करुन नयेत, अशी सूचना त्यांनी बुधवारी केली. कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची व्यवस्था केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या घटनापीठाच्या न्यायालयात कागद असणार नाहीत. ते पूर्णतः ‘हरित’ असेल. त्यामुळे विधीज्ञांनी या घटनापीठासमोर कोणतेही कागद आणू नयेत. न्यायालयाला कोणतीही कागदपत्रे सादरही करु नयेत. यावर काही वकीलांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, विधीज्ञांना त्यासंबंधातील प्रशिक्षण हवे असल्यास ते देण्याची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेली आहे. तेथे योग्य ती तयारी करुन घेतली जाईल, असे स्पष्टीकरण न्या. चंद्रचूड यांनी केले.
प्रशिक्षणात कुशल अधिकारी
या संदर्भात न्यायाधीशांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे प्रतिपादन याच घटनापीठाचे सदस्य न्या. एम. आर. शहा यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी प्रशिक्षण देण्यात कुशल आहेत. त्यांच्याकडून सर्व इच्छुकांना प्रशिक्षण मिळू शकते, असे स्पष्टीकरण न्या. शहा यांनी दिले.
नोंदणी विभागाला आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागाने सर्व फायलींचे स्कॅनिंग करावे आणि डिजिटल प्रती सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांना पुरविण्यात याव्यात, असाही न्या. चंद्रचूड यांनी दिला. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात प्रशासकीय नियंत्रणासंबंधी चाललेल्या वादाच्या सुनावणीच्या वेळी हा आदेश देण्यात आला.