नवनिर्वाचित पंचसदस्यांना मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी/ पणजी
रोजच्या कचऱयासोबत वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावणे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालये आणि दवाखाने चालविणाऱयांना केले आहे. वैद्यकीय कचऱयाची जैववैद्यकीय कचरा म्हणून स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या पंचसदस्यांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण रुग्णालये तसेच दवाखान्यांच्या चालकांनी आपल्या वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट रोजच्या कचऱयासोबत लावणे टाळावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर ’स्वच्छ पंचायत’ उपक्रमाला चालना देण्यासाठी केशकर्तनालयातील कचरा तसेच चिकन-मटणाच्या दुकानातील अवशेष यांची जैव वैद्यकीय कचरा म्हणून विल्हेवाट लावली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अशा कचऱयासाठी ग्रामपंचायत पातळीवर नवीन प्रकल्प प्रस्ताव आणि उपक्रमांसाठी पंचसदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, ’सरकार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हल्लीच सुरू करण्यात आलेला ’मंत्री तुमच्या दारी’ कार्यक्रम नवीन वर्षापासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे उर्वरित मतदारसंघ पूर्ण करण्यात येतील, असे ते पुढे म्हणाले.
सांगे येथील प्रस्तावित आदिवासी संशोधन संस्थेची नोंदणी प्रक्रिया गोवा राज्य अनुसूचित जमाती आर्थिक महामंडळातर्फे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आपण आदिवासी संशोधन संस्थेच्या अंतर्गत प्रक्रिया तसेच प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला असून संस्थेचे स्थापनाकार्य सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.