बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाशेजारी असणाऱ्या हलगा गावातून गेलेल्या सर्व्हिस रोडवर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाही याचा धोका निर्माण झाला असून त्वरित सर्व्हिस रोडवरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन अॅड. आण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. बस्तवाड-हलगा ते बेळगाव या सर्व्हिस रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी होती. या रस्त्यावरूनच या भागातील कामगारांची व ग्रामस्थांची दैनंदिन ये-जा होत असते. बेळगावला रोजगारासाठी येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.
गेल्या काही दिवसांपासून या सर्व्हिस रोडवर वारंवार अपघात घडत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अपघात रोखण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक सिग्नल उभारण्याची गरज आहे. अशा कोणत्याच उपाययोजना नसल्या कारणाने अपघाताला कारण ठरत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेही निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. महामार्ग प्राधिकारच्या अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष पुरवून खड्डे बुजवावेत. अन् अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी अॅड. मोहन नंदी, अॅड. शरद देसाई, अॅड. एम. के. कांबळे, अॅड. आर. एम. नलवडे, अॅड. गणेश भाविकट्टी, अॅड. महादेव शहापूर, अॅड. चंद्रकांत काकडे, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.