शिक्षण खात्याचे सर्व विद्यालयांना परिपत्रक
प्रतिनिधी /पणजी
कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि जादा शिकवणीचे 200 तास घेणे शाळांना, शिक्षकांना बंधनकारक करण्यात आले असून तसे परिपत्रक शिक्षण खात्याने शाळांसाठी जारी केले आहे.
नुकत्याच संपुष्टात आलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात कमकुवत शाळकरी मुलांसाठी जादा शिकवणी वर्ग (रेमेडियल क्लास) घेण्याचे आवाहन केले होते अणि ते बंधनकारक करणार असल्याचे म्हटले होते. त्याची आता कार्यवाही शाळांना करावी लागणार आहे. या जादा शिकवणीचा मासिक अहवाल शिक्षण खात्याकडे पाठवावा आणि तो पाठवला नसल्यास शाळा प्रमुखांवर कारवाई करणार असल्याचे परिपत्रकातून बजावण्यात आले आहे.
शिक्षणात मागे राहिले विद्यार्थी
कोरोनामुळे मुलांचा शाळांशी सुमारे 2 वर्षे संपर्क तुटला होता. त्या काळात मुले शिक्षणात मागे राहिली असल्याने त्यांना पुन्हा तयार करण्यासाठी जादा शिकवणीवर्ग अत्यावश्यक आहेत असे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा पूर्ववत सुरू झाल्या असून मुलांना आता अडचणी येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी ही जादा शिकवणी घेणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापकांनी करावे नियोजन
शाळा प्रमुखांनी (मुख्याध्यापक) या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन जादा शिकवणी वर्गाचे योग्य ते नियोजन करावे. त्यासाठी महिनाभराचा आराखडा तयार करावा आणि सर्व शिक्षकांना त्यात सामावून घ्यावे. त्या शिकवणीचा अधून-मधून आढावा घेण्यात यावा. मुलांची प्रगती होते की नाही याची तपासणी करावी असेही बजावण्यात आले आहे.
शिक्षण खात्याच्या या आदेशामुळे शिक्षकांवरील शिकवणीचा भार वाढला असून शिक्षणात कमकुवत असलेल्या मुलांना शिक्षकांसमवेत शाळा सुटल्यानंतर थांबावे लागणार आहे. हे शिकवणी वर्ग तातडीने सुरू करावेत असे निर्देश परिपत्रकातून देण्यात आले आहेत.