जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांची टास्क फोर्स कमिटीच्या बैठकीत सूचना
प्रतिनिधी/ .बेळगाव
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टास्क फोर्स कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये अल्पवयीन मुली व महिलांवर होत असलेल्या अन्यायाबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. अल्पवयीन मुली व महिलांवर अन्याय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई कशाप्रकारे केली जाईल, याचा विचार विनिमय करण्यात आला.
लहान मुलांची विक्री करण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यालाही आळा घालण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. आतापर्यंत किती खटल्यांमध्ये अशा आरोपींना शिक्षा झाली, सध्या किती खटले प्रलंबित आहेत, त्यामधील संशयितांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन, महिला व बालकल्याण खाते आणि न्यायालयातील कमिटीने जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांनी या बैठकीत सांगितले.
मानव हक्क आयोगांतर्गत आलेल्या तक्रारींवरही चर्चा केली. आतापर्यंत किती एफआयआर दाखल झाले, न्यायालयामध्ये कोणकोणत्या अत्याचारित खटल्यांमध्ये दोषारोप दाखल करण्यात आले आहेत, गुन्हा दाखल केल्यानंतर किती जणांना अटक करण्यात आली? याचीही चर्चा जिल्हा न्यायाधीशांनी पोलीस प्रशासनाबरोबर केली आहे. या बैठकीला महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी, पोलीस विभागाचेही अधिकारी उपस्थित होते.
कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारे कामगारावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या, असेदेखील स्पष्ट करण्यात आले. जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील पाणी समस्या, पूर समस्या आणि विविध विकासकामांबाबतची माहिती बैठकीत घेतली गेली. जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याकडे टास्क फोर्स कमिटीने अधिक लक्ष द्यावे, असे या बैठकीत सर्वांनी ठरविले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांवर व लहान मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कठोरात कठोर पाऊल उचलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे जिल्हा न्यायाधीशांनी या बैठकीत सांगितले.
प्रारंभी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रे•ाr यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर गांभीर्याने चर्चा केली.