कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसची मागणीः मोर्चाने कुलगुरूंना निवेदन : विद्यापीठाच्या गेटवर हजारो विद्यार्थ्यांचा ठिय्या
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा एम. सी. क्यू. पध्दतीने होणार होत्या, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातही त्याच पध्दतीने शिक्षण दिले आहे. असे असतानाही ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेवून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एम. सी. क्यू. पध्दतीने घ्या, या मागणीसाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठावर मोर्चा जावून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन दिले. या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाल्याने दुपारपर्यंत विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता.
निवेदनात म्हंटले आहे, राज्यातील पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, गडचिरोली येथील विद्यापीठांमध्ये ऑफलाईन एम. सी. क्यू. पध्दतीने परीक्षा घेतल्या आहेत. दिर्घोत्तरी उत्तरपत्रिका तपासणीसणीत वेळ जाईल, इतर विद्यापीठाच्या बरोबरीने शिवाजी विद्यापीठ जाणार नाही. राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसुत्रता राहावी. दिर्घोत्तरी परीक्षा घेतली तर इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील. परिणामी शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडतील. एस. टी. चा संप एप्रिल अखेरपर्यंत होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता आलेले नाही. 60 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झाल्याने ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणे विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. अशा परिस्थितीत परीक्षा दिली तर शैक्षणिक गुणवत्ता कमी होवू शकते. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी प्रवेश, नोकरीसाठी जायचे असेल तर विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडतील. तरी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पध्दतीमध्ये एकसमानता असावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एम. सी. क्यू. पध्दतीने घ्या या मागणीसाठी विद्यापीठाच्या गेटवर मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य गेटवर हजारो विद्यार्थी एकत्र आल्याने कागल रोडवर आपोआपच रास्ता रोको झाला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनामुळे विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. यावेळी एनएसयूआयचे अध्यक्ष अक्षय शेळके, उद्य पोवार, दिपक थोरात, उमेश पाडळकर, वैभव तहसिलदार, आनंदा करपे, मयुर पाटील, पार्थ देसाई, आदित्य कांबळे, रोहन शरबिद्रे, मुबिन मुश्रीफ, विनायक पाटील, सत्यजित पाटील, असद सय्यद, राहुल मिणचेकर, अभिजीत भोसले आदी उपस्थित होते.
वाहतुक थांबली
ऑफलाईन एम. सी. क्यू. पध्दतीने परीक्षा घ्या या मागणीसाठी हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर एकत्र आल्याने कागल रोडवरील वाहतुक थांबली होती. दुपारी तीनपर्यंत विद्यार्थी गेटवर बसून होते. विद्यापीठाच्या विरोधात घोषणाबाजी करून विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांची गर्दी पाहुन राजारामपुरी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून बाजूला केले. त्यानंतर कागल रोडची वाहतुक सुरळीत झाली.
कुलगुरूंनी केली शिष्टमंडळाशी चर्चा
ऑफलाईन एम. सी. क्यू. पध्दतीने परीक्षा घ्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी कुलगुरू, प्रकुलगुरू आणि परीक्षा संचालकांनी चर्चा केली. उद्या (दि. 23) रोजी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागणीविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.