फारुख अब्दुल्लांचा केंद्र सरकारला सल्ला
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगवर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी वक्तव्य केले आहे. भारत जोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करत नाही तोवर काश्मीरमधील हत्यासत्र थांबणार नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
काश्मीरमध्ये कलम 370 मुळे टार्गेट किलिंग होते असे भाजपकडून पूर्वी म्हटले जायचे. कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला आता 4 वर्षे झाली आहेत आणि आता काश्मिरी पंडितांवरील हल्लेही वाढले आहेत. काश्मीरमध्ये कलम 370 मुळे लोकांच्या हत्या होत होत्या, तर आता दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भटला का ठार केले? भाजपकडे या प्रश्नाचे उत्तर आहे का असे प्रश्नार्थक विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.
कलम 370 हे हत्यासत्रासाठी जबाबदार नव्हते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱया हत्या या देशाबाहेरून घडवून आणल्या जात आहेत. यात काश्मिरींचा कुठलाच हात नाही. अशा स्थितीत पाकिस्तानशी चर्चा न करता हा प्रकार समाप्त करता येणार नसल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे.
लडाख क्षेत्रात सीमा वाद सोडविण्यासाठी भारत चीनसोबत चर्चा करत आहे. अशाचप्रकारे काश्मीरमधील हत्यासत्र रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा पुढाकार घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.