बोलू आवडी कौतुके। शब्दांचेनि सत्त्व निके।
आटाटोनी वास्तविके। अर्पियले श्रोतृवृंदासि।
अर्थातच बोलणे, वदणे, वचणे, सांगणे थोडक्मयात हे बोलांचं कौतुक आहे. कंठ या माध्यमाचा वापर फक्त गाण्यासाठीच होतो असं थोडंच आहे? खरं तर त्याचा मुख्य उपयोग हा बोलण्यासाठी होतो. अर्थात खाण्यासाठी आणि पिण्यासाठीही होतोच, पण आपण बोलतो आहोत ते कलेविषयी. त्यामुळे गाणं या विषयाला अनुसरून कंठाचा वापर आपण कशाप्रकारे करतो त्याचा विचार आपण करू. मित्रहो आपण गाण्याची अशी मैफल बघितली आहे का, की जिच्यात फक्त गायक आणि वादक आपापली कला सलगपणे कुठेही न थांबता मांडतच जातात? तर नाही. कुठेतरी थांबा घेत घेत ते आपलं गाणं सादर करीत असतात. त्यांना मध्ये मध्ये थोडीतरी विश्रांती आवश्यक असते. पण मग अशी विश्रांती मिळणार तरी कशी? तेवढय़ा वेळात प्रेक्षक तरी काय करणार? त्यांनाही कंटाळा येता कामा नये. म्हणजे त्यांचीही सोय पहायला हवीच. एक कलाकार कार्यक्रमात गायच्या गाण्याची तयारी करत होते. पण समोर बसलेल्या रसिकांना प्रश्न पडला की बुवा जे गाणं गातायत ते आहे तरी कुठल्या काळातलं? भाषेवरून तर जुनं दिसतंय. म्हणजे मूळ गायक कोण असेल? याची माहिती सुटसुटीतपणे कशी मिळेल? मिश्कीलपणे हसत बुवांनी उत्तर दिलं, ‘ते सगळं कार्यक्रमात कळेल. त्यासाठी तिथे अवश्य या तुम्ही!’ एकाने कूतुहलाने विचारले, ‘अच्छा, म्हणजे तुम्ही सांगणार का?’ बुवांनी ‘नाही’ असं हुंकारार्थी उत्तर दिलं. ‘मग?’ परत प्रश्न आलाच. ‘ते तिथेच कळेल.’ आता अचंबित असलेल्या मंडळींनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. आणि कोण सांगणार होते ते त्यांना कळलं. प्रश्न एवढा गमतीदार आहे! देवाच्या वार्षिकोत्सवात आलेल्या कीर्तनकारांना जन्माचं कीर्तन आटोपल्यावर त्या दिवशी रात्री काम नव्हतं. मंडळींनी विनंती केली की बुवा तुम्हीही स्टेजवर या. आम्ही गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.? ते म्हणाले की अरे तिथे माझं काय काम? तर मंडळींनी मोठं सुरेख उत्तर दिलं, की बुवा आम्ही अभंग आणि भजन गाणार आहोत. आणि अभंग आणि भजन आळवलं की निरूपण ओघानेच आलं. आजच्यापुरती थोडी भूमिका बदला. एवढंच हवंय. बुवांनी आनंदाने मान्य केलं. आणि कार्यक्रम रंगला. तर मंडळी, या सगळय़ात एक सामायिक सूत्र दिसतंय का आपल्याला? जर उत्तर होकारार्थी असेल तर आपण बरोबर चाललोय. विषय आहे निवेदनाचा, सूत्रसंचालनाचा. सुरांच्या रांगेतल्या शब्दांच्या मोठेपणाचा. तसं पाहता गाण्याच्या मैफिलीत स्टार असतात ते तबलेतंबोरे आणि त्यापाठची माणसं. मग ज्याला तबला लागत नाही, ना तंबोरा लागत, तो गात नाही की गाणं वाजवत नाही पण कार्यक्रमाचं नाणं खणखणीत वाजविण्यात मात्र त्याचा हातखंडा असतो. त्याच्या बोलण्यातून आपल्याला गाण्याचं आणि गाणाऱयाचंही कूळ आणि मूळ कळतं. गाण्याबद्दलचे किस्से और कहानियाँ माहिती होतात. गायकांना मध्ये मध्ये विश्रांती मिळते. श्रोत्यांना मधल्या काळात कंटाळा येत नाही. हलकंफुलकं बोलणं त्यांना रिझवतं. शास्त्रीय संगीत मैफिलीत तर अभ्यासपूर्ण विवेचन, गाण्याचं विश्लेषण आणि गायकाचा मूड उल्हसित ठेवणे ही सगळी आघाडी एकहाती सांभाळणारं कोण असतं? तर सूत्रसंचालक, निवेदक, निरूपक!
यांचं वैशिष्टय़ असं असतं की कुशल फुलकाराने सुंदर ताजी फुलं मुलायम रेशमी दोऱयात ओवून सुंदर हार करावा तसाच या कार्यक्रमातील गाणेरूपी फुलं सूत्रसंचालक त्यांच्या बोलण्याच्या सूत्रात भराभर गुंफत जातात. बैठकीला सलगता येते ती सूत्रसंचालनामुळे! कसं असतं की कलाकारांना भर कार्यक्रमात स्वतःबद्दल स्वतःच सगळं सांगत बसणं शक्मय नसतं. ते बरंही दिसत नाही. शिवाय वादक कलाकारांची सुंदर ओळख करून देणं त्यांना स्वतःला शक्मय नसतं. आणि मुख्य म्हणजे ज्या कार्यासाठी ते रंगमंचावर आलेले असतात ते करण्यासाठी त्यांचा गळा आणि एनर्जी शेवटपर्यंत शिल्लक राहणंही अत्यावश्यक असतं. श्रोते गाणं ऐकण्यासाठी आलेले असतात. पण या
‘मदविलसिततनगतापंकयुता मुखमलिनाधना’ सारख्या भयानक कठीण वाटणाऱया ओळींचा अर्थ नक्की काय, हे त्यांना हवं असतं. गाण्याचा इतिहास, ते कसं घडलं? त्यात काही बदल होत गेले आहेत का, ही सगळी मनोरंजक बाजू त्यांना ऐकायची असते. त्यांना उत्सुकता असते. समोर बसलेल्या कलाकारांचा मोठेपणा, कलाकार म्हणून त्यांचं असलेलं स्थान, मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कोण? याविषयी कूतुहल असतं. वेगवेगळय़ा घराण्यांच्या गाण्यात नक्की काय फरक असतो ही माहिती रंजक ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमात सुसूत्रता, सलगता ठेवणे, काहीही कारणाने रंगमंचावर अनवस्था वेळ आली तर ती श्रोत्यांना कळू न देणे, तोपर्यंत त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवणे आणि इतर कलाकारांइतकीच किंबहुना जास्त महत्त्वाची भूमिका बजावणे ही त्यांची जबाबदारी असते. सूत्रसंचालनाची ही परंपरा इतकी जुनी आहे की ती थेट काही हजार वर्षांपूर्वी असलेल्या संस्कृत नाटकांच्या परंपरेपासून सुरू होते. तिथे देखील सूत्रधार असत. ते त्या नाटकाच्या विषयाची थोडी माहिती, रूपरेषा सांगत असत. नांदीपासून ते भरतवाक्मयापर्यंत त्यांची एक विशिष्ट भूमिका असे. तिथेपासून ते पुढे हा प्रवास अमीन सयानी, प्रदीप भिडे, सुधीर गाडगीळ, सिद्धार्थ काक, रेणुका शहाणे, सुप्रसिद्ध समीक्षक मुकुंद संगोराम, केशव परांजपे पासून सुरू होऊन ते मंगला खाडिलकर, ‘तुम्हारी सुलू’ मधल्या आरजे सुलूपर्यंत येऊन संपतो. खरं तर संपत नाहीच तर पुढे सुरूच राहतो. ही एक दिंडी आहे. ती कधी कमी होत नाही. एकेक वारकरी यात सामील होतच जातात.
एका चांगल्या सूत्रसंचालकाला खूप आघाडय़ांवर तयारी करावी लागते. सर्वात प्रथम म्हणजे तो एक उत्तम वाचक असावा लागतो. तसंच त्याने एक उत्तम श्रोता असणंही गरजेचं असतं. त्याची भाषेवरची पकड मजबूत असावी लागते. आणि प्रसंगानुरूप ती भाषा कशी चपखलपणे वळवावी याचं ज्ञान असावं लागतं. त्याने कार्यक्रमाचे दुवे जुळते ठेवायचे असतात. त्यासाठी निवेदन रटाळ होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सादर होणारी गाणी ही कोणत्या प्रकारची आहेत यावरून आपल्याला काय बोलायचं आहे. याची आखणी करावी लागते. कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना लक्षात घेऊन कंटेंट ठरवावा लागतो. कलाकार व श्रोते यामधला दुवा म्हणजे सूत्रसंचालक. श्रोत्यांकडून येणाऱया फर्माईशीच्या चिठ्ठय़ा त्यांच्याकडे येतात. गायकांना निरोप देण्याच्या चिठ्ठय़ाही त्यांनीच पोहोचवायच्या असतात. न गाता गाणं समजून पोहोचविणारा, इतरांच्या हातात हात घेऊन त्यांना श्रोत्यांशी संवाद करायला आणणारा तोच असतो. म्हणून त्याला ‘संवादक’ ही म्हणतात. सूत्रसंचालनाचा हा मनोज्ञ प्रवास खरंच आनंददायी असतो. गाण्यातील एकही सूर न लावता, न वाजवता गायकवादकांच्या बरोबरीने रंगमंचावर शेवटपर्यंत असणारा आणि गाणं सर्वात जवळून ऐकण्याचं भाग्य असणारा नशीबवान जीव म्हणजे सूत्रसंचालक होय! सूत्रसंचालकांच्या सगळय़ा टीमला अभिवादन!
-ऍड. अपर्णा परांजपे- प्रभु