सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
सुगम संगीत असो, शास्त्रीय संगीत असो किंवा बैठकीत गाणाऱयाच्या मैफलीमध्ये ‘तानपूरा’ किंवा ‘तंबोरा’ हे तंतूवाद्य हमखास असायचे. परंतू आजच्या जमान्यात तानपूऱयाचा वापर कमी झाल्याचे जाणवते. विद्युत किंवा बॅटरीवर चालणाऱया स्वरयंत्राचाच वापर आज सर्वसाधारण मैफलीमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचे जाणवते. कदाचित कालांतराने ‘तंबोरा’ हे वाद्यच कालबाह्य़ झाले तर नवल नाही.
इलेक्ट्रोनिक तानपूरा नवापर्याय
एका जागेवरून दुसऱया ठिकाणी तानपूरा न्यायचा झाल्यास गायकाना ते जोखीमीचे वाटायचे. कधी बसगाडी, रेल्वे तर कधी विमानातून तानपूरे नेताना कलाकारांची दमछाक व्हायची. मैफलीतही तानपूरा व्यवस्थित जुळवेपर्यंत श्रोत्यांना मैफल सुरु होण्याची प्रतिक्षा असायची. मैफल चालू असताना तानपूरा विसंगत वाजू लागला तर त्याचे परिणाम गायकाच्या सादरीकरणावर व्हायचा. म्हणूनच स्वरयंत्राने तानपूऱयाची जागा बऱयाच प्रमाणात भरून काढल्याचे तज्ञ कलाकारांचे मत आहे.
गायकाच्या प्रतिष्ठेशी जोडलेले वाद्य
पुरातन काळापासून भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील गवय्ये गायनासाठी उपयुक्त असलेले ‘तानपूरा’ किंवा ‘तंबोरा’ हे तंतूवाद्य स्वतःकडे बाळगायचे. रियाजासाठी तंबोरा हे वाद्य अनिवार्य असायचे. इतकेच नव्हे तर व्हायोलीन, सतार, सारंगी, हार्मोनियम किंवा संवादिनीच्या एकलवादनात तानपूऱयाचा सर्रास वापर केला जायचा. तानपूरा छेडण्यासाठी गाणाऱयाच्या मागे दोन दोन शिष्य बसायचे. वातावरण निर्मिती, स्वरांचा भरणा आणि गाणाऱयाच्या मैफलीत सूरांचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी तानपूरा हे अत्यावश्यक तंतूवाद्य असायचे.
एकतारी, विणा, आदी तंतूवाद्याचा उल्लेख पूराणकाळामध्येही सापडतो. संगीताला पुराणकाळापासूनच प्रतिष्ठा आहे. संगीतप्रेमी राजा महाराजांच्या दरबारातील गायकही तंबोरा साथीला घेऊनच गायचे. थोडक्यात तंबोरा किंवा तानपूरा हे गायक वादकांच्या प्रतिष्ठेशी जोडलेले वाद्य आहे.
नादोत्पत्तीसाठी उपयुक्त तंतूवाद्य
तानपूरा हे महागडे वाद्य. आज रु. 20,000 पासून पुढे अशी चांगल्या दर्जाच्या तानपूऱयाची किंमत आहे. अतिशय नाजूक आणि विशिष्ट जातीचा भोपळा किंवा दूधीपासून त्याची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र गोव्यामध्ये तानपूऱयाची निर्मिती होत नाही. तानपूऱयाला चार तारा असतात पैकी पहिली पंचम किंवा मध्यम नादोत्पत्तीसाठी तर इतर तिन्ही षडजोत्पत्तीसाठी वापरतात. काही गाणारे षडजऐवजी ‘निषाद’साठीही एक दोन तारांचा वापर करतात. त्यामुळे गाणाऱयाच्या कंठाला चांगली धार येते आणि गाण्यातला सुरेलपणा वाढतो असे मानले जाते.
तानपूऱयाची दुरुस्ती हा यक्ष प्रश्न
आज तानपूऱयाची दुरुस्ती करणारे मिस्त्री गोव्यात नाहीत त्यामुळे तानपूऱयाची ‘मशागत’ हा यक्ष प्रश्न कलाकारांपुढे असायचा. दुरुस्ती, टय़ुनिंग किंवा जवारी काढण्यासाठी खास करून महाराष्ट्रातील मिरजमधून या मिस्त्रीना गोव्यात आणून एकदमच त्यांच्याकडून आठ दहा तानपूऱयांची दुरुस्ती केली जायची. त्यामुळे खर्चही वाटून घेतला जायचा. चांगले स्वरयंत्र हे सात आठ हजार रुपयात उपलब्ध असते. तानपूऱयाचा आनंद हे विद्युत यंत्र देऊ शकत नाही. मात्र गाणाऱयांच्या मैफलीत तानपूऱयाची जागा घेतलेले हे यंत्र कलाकारांसाठी वरदानच ठरले असून भजन गायकी आणि लोकसंगीतामध्येही स्वरयंत्राचा वापर अचूक होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. स्वरयंत्र ही संकल्पना आता गायक कलाकारांमध्ये तर प्रथम पसंती ठरलेली आहे. गाणाऱया कलाकारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या रियाज करण्याच्या खोलीतील तानपूरे आता गायब व्हायला लागलेत त्याची जागा आता स्वरयंत्रांनी घेतली आहे.