तामिळनाडूतील विमानतळ टर्मिनल इमारतीचे केले उद्घाटन
वृत्तसंस्था/ तिरुचिरापल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले आहे. ही इमारत 1100 कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी याचबरोबर रेल्वे, रस्ते, तेल आणि गॅस, शिपिंग आणि उच्चशिक्षण क्षेत्राशी निगडित 19 हजार 850 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकासप्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना तामिळनाडू हे मेक इन इंडिया मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधानांनी भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत सोहळ्यात भाग घेतला आहे. त्यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले आहे. पंतप्रधानांसाब्sात यावेळी राज्यपाल आर.एन. रवि आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन देखील उपस्थित होते. तामिळनाडूनंतर पंतप्रधान मोदी हे दुपारी लक्षद्वीपमध्ये पोहोचले आहेत. तेथे त्यांच्या हस्ते 1 हजार 150 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि कार्यारंभ होणार आहे. 3 जानेवारी रोजी ते लक्षद्वीपच्या काही कार्यक्रमांमध्ये सामील झाल्यावर केरळमध्ये पोहोचणार आहेत.
तमिळ संस्कृतीविषयी बरेच काही शिकलो
देशाला तामिळनाडूच्या जिवंत संस्कृती आणि वारशाबद्दल गर्व आहे. माझे अनेक तमिळ मित्र होते, त्यांच्याकडून मला तमिळ संस्कृतीविषयी बरेच काही शिकता आले. मी जगात जेथे कुठे जातो, तेव्हा स्वत:ला तामिळनाडूविषयी बोलण्यापासून रोखू शकत नाही. तमिळ वारशाने भारताला दिलेल्या सुशासनाच्या मॉडेलकडून प्रेरणा घेत पवित्र सेंगोल नव्या संसद भवनात स्थापित करण्यात आला असल्याचे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत.
5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
भारत जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. आमच्या देशात जगातील मोठे गुंतवणुकदार गुंतवणूक करत आहेत. याचा लाभ तामिळनाडू आणि देशाच्या जनतेला मिळतोय. तामिळनाडू मेक इन इंडियाचा मोठा ब्रँड अॅम्बेसिडर ठरत असल्याचे मोदी म्हणले.
राज्याच्या लोकांसोबत केंद्र
विकसित भारताबद्दल मी जेव्हा बोलतो, तेव्हा त्यात आर्थिक आणि सांस्कृतिक दोन्ही पैलू सामील असतात. मागील काही आठवडे तामिळनाडूच्या लोकांसाठी संकटाचे ठरले आहेत. अतिवृष्टीमुळे आम्ही अनेक जणांना गमाविले आहे. राज्याच्या संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार या अवघड समयी तामिळनाडूच्या लोकांसोबत उभे आहे. आम्ही राज्याला सर्वप्रकारे मदत करू असे मोदींनी म्हटले आहे.
अण्णाद्रमुक रालोआतून बाहेर पडल्यावर पंतप्रधान मोदींचा हा पहिला तामिळनाडू दौरा आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत. या दौऱ्यातून आमच्या पक्षाने राज्यात काय करावे याची दिशा मिळू शकेल असे अण्णाद्रमुकच्या एका नेत्याने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात अण्णाद्रमुकने रालोआतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनी अण्णाद्रमुकला पुन्हा आघाडीत आणण्याचे प्रयत्न करणर की नाही हे स्पष्ट केलेले नाही. सध्या तामिळनाडूत भाजप एकला चलो रेच्या भूमिकेत आहे.