बांगलादेशच्या वनडे संघाचे सोडले कर्णधारपद : दुखापतीमुळे आशिया चषकातूनही बाहेर
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा दिग्गज खेळाडू व वनडे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तमिमला पाठीची दुखापत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का देत बांगलादेशच्या वनडे संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. आता, आशिया चषकानंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी तो संघात पुनरागमन करेल, अशी आशा बांगलादेश क्रिकेट मंडळाने व्यक्त केली आहे. तमिमच्या राजीनाम्यामुळे शेवटच्या क्षणी बांगलादेश संघाला आपला कर्णधार निवडावा लागणार आहे.
तमिमने ढाका येथे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर दुखापतीच्या समस्येचे कारण देत आपला निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या त्याच्या यू-टर्ननंतर एका महिन्याच्या आत त्याने हा निर्णय घेतल्याने बांगलादेश क्रिकेटमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न साहजिकच चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर दुखापतीमुळे कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. तसेच मी नेहमीच संघाचा विचार केला आहे. संघाच्या भल्यासाठी मी कर्णधारपद सोडले पाहिजे आणि एक खेळाडू म्हणून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा माझा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, जुलैमध्ये नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेदरम्यान तमिमने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु पंतप्रधान हसीना यांच्या विनंतीवरून एक दिवसानंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला होता. आता, पुन्हा त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
विश्वचषकासाठी सज्ज होणार तमिम
दरम्यान, तमिम सोमवारी (दि. 31 जुलै) पाठीवर उपचार घेऊन इंग्लंडहून परतला. त्याने तातडीचा उपाय म्हणून अनेक इंजेक्शनही घेतले आहेत. सध्या तमिम पूर्णपणे विश्रांती घेत आहे. तसेच, कमीत कमी तो पुढील आठवड्यापूर्वी आपली रिहॅब प्रक्रिया सुरू करू शकणार नाही. मात्र, उपचारानंतरही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कदाचित भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी तमिमला विश्रांती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. अशात तो केव्हापर्यंत पुनरागमन करतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, बांगलादेश क्रिकेट बोर्ड वनडे संघाचे कर्णधारपद कुणाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तमिम कर्णधार असताना त्याच्या अनुपस्थितीत अनेकदा लिटन दासने संघाचे नेतृत्व केले आहे. यामुळे आशिया चषकात लिटन दास बांगलादेश संघाची धुरा सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे.