समस्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : ठराविक भागातच विकास करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. मात्र काही ठराविक भागातच विकास करण्यात येत असल्याने काही परिसर विकासापासून वंचित आहे. तसेच जुना धारवाड रोड आणि तानाजी गल्ली परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून समस्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
स्मार्ट शहर बनविण्यासाठी प्रशासन आटापिटा करीत आहे. कोटय़वधी निधीचा चुराडा करून रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारीचे बांधकाम व इतर विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र सदर कामे ही ठराविक भागातच करण्यात येत आहेत. तर काही भाग दुर्लक्षित असल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध होणे कठीण बनले आहे. परिणामी या भागातील नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. जुना धारवाड रोड परिसरात उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र या भागातील समस्यांचे निवारण करण्यांकडे महापालिका, रेल्वे खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला आहे. परिणामी येथील नागरिकांनी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे
जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाच्या उभारणीनंतर सर्व्हीस रस्ता निर्माण करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्याचप्रमाणे येथून वाहणाऱया नाल्याची भिंत खराब झाली असून, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच नाल्याच्या चेंबरवरील झाकण गायब झाल्याने येथील रस्त्यावरील चेंबर उघडे आहेत. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. विशेषतः तानाजी गल्ली आणि महाद्वार रोड परिसरातील उड्डाणपुलाशेजारील उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत.
महाद्वार रोड मुख्य गल्ली आणि तानाजी गल्लीमध्ये भंगीबोळ सोडले आहेत. सदर बोळातील रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. तसेच भंगीबोळात मातीचे ढिगारे साचले आहेत. तसेच कचरा टाकल्याने असलेला रस्ता देखील बंद झाला आहे. कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरत असून, रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
समस्या निवारणाची मागणी
तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली गटार तांत्रिकदृष्टय़ा चुकीची असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याऐवजी पावसाचे पाणी भंगीबोळात साचत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. बहुतांश घरांची विभागणी झाल्याने काही रहिवासी ये-जा करण्यासाठी भंगीबोळाचा वापर करीत असतात. पण पावसाळय़ात साचणारे पाणी व रस्त्यावरील कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे चालत जाणेही मुश्कील बनले आहे. वाहने पार्क करण्यासही अडथळा निर्माण होत आहे. येथील समस्यांची पाहणी करून निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.