पुणे / प्रतिनिधी :
मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एखादे वाक्य केले, की त्याची मोडतोड करून ते प्रसारमाध्यमातून समोर आणले जाते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो. ग्रामीण आणि शहरी व्यक्तींच्या भावना व्यक्त करण्यातील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे तानाजी सावंतांची पाठराखण केली.
तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा म्हणाले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबाबतही असा वाद नेहमी उद्भवतो. वास्तविक सावंत यांचे म्हणणे वेगळे होते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले गेले. ते उच्च न्यायालयात टिकले आणि सुप्रीम कोर्टाततही ते एक वर्ष टिकून राहिले. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी कोणतीच पावले न उचलल्याने हे आरक्षण गेले, असे त्यांना म्हणायचे होते. परंतु, या विधानाचा विपर्यास केला गेला.
अधिक वाचा : PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय, भाजपचे ज्येष्ठ नेते
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे नुकतेच आंदोलन केले होते. यावर महाविकास आघाडी सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजपतर्फे मविआविरोधात आंदोलन केले जात आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात रहावा, यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. उलट ते येथे कशाप्रकारे येणार नाहीत, यादृष्टीनेच प्रयत्न झाला. त्यांना गुजरात राज्याने सुविधा दिल्याने कंपनी गुजरातला गेली. त्यामुळे आगामी काळात असे प्रकार टाळण्यासाठी आपण उद्योगांना रेड कार्पेट दिले पाहिजे आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.