कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होवून एक महिना झाला तरी अद्याप अकरावीला प्रवेश मिळालेला नाही. दहावी सीबीएससी आणि आयसीसी बोर्डाच्या दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी ८० टक्के विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून नावनोंदणी व शाखा निश्चितीच्या पुढे गाडी गेलेली नाही. त्यामुळे अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला मुहुर्त मिळेना, अशी चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे.
शासकीय तंत्रनिकेतनच्या ७०० जागांसाठी १३०० अर्ज आले आहेत. तर आयटीआयच्या १३०० जागांसाठी २९०० अर्ज आले आहेत. त्यामुळे तंत्रनिकेतन आणि आयटीआय या दोन्ही अभ्यासक्रमाला क्षमतेपेक्षा डबल अर्ज आले आहेत. शहरातील ३१ महाविद्यालयातील अकरावी वाणिज्य, विज्ञान शाखेच्या १० हजार ९६० जागांसाठी आतापर्यंत ७४९१ अर्ज आले आहेत. अकरावीला यंदा क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत. असे असले तरी दहावी सीबीएससी आणि आयसीसी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेणाऱयांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंत्रालयाने या दोन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाल्याशिवाय अकरावी, तंत्रनिकेतन आणि आयटीआयची पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू नयेत, असे आदेश प्रत्येक जिल्हय़ातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया मंत्रालयातील आदेशाशिवाय होणार नाही, हे निश्चित. जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी पुढील प्रवेश सुरू करण्यासंदर्भातील आदेशाची वाट पाहात आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शाखानिहाय अकरावी प्रवेश
विज्ञान ः ५२०६
वाणिज्य मराठी माध्यमः १२९३
वाणिज्य इंग्रजी माध्यम ः९९२
एकूण ः ७४९१