6 ते 7 हजार कोटी रुपयांमध्ये व्यवहार होणार : शुद्ध पाणी क्षेत्रात कंपनी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शुद्ध पाण्याच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणारी बिस्लेरी ही कंपनी लवकरच टाटा कंझ्युमर आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाटा कंझ्युमर बिस्लेरी इंटरनॅशनलचे अधिग्रहण करण्यासाठी अंदाजे 6 ते 7 हजार कोटी रुपये मोजणार असल्याचे सांगितले जात आहे. बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चव्हाण हे गेली कित्येक वर्षे कंपनीचा व्यवसाय हाताळत असून त्यांचा हा व्यवहार पाहण्यासाठी कोणी वारस नसल्याने कंपनी विकण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. याआधी त्यांनी थम्सअप्, गोल्डस्पॉट आणि लिम्का ते कोकोकोला या सर्व कंपन्या विक्री केल्या आहेत. पॅकेज पाण्याच्या क्षेत्रामध्ये भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून बिस्लेरीचा उल्लेख आवर्जून केला जातो.
2500 कोटीची उलाढाल
या कंपनीची उलाढाल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2500 कोटी रुपयांची दिसून आली आहे. कंपनीने याच आर्थिक वर्षात 220 कोटींचा नफाही पदरात पाडून घेतला आहे. या संदर्भात भावूक होत बोलताना रमेश चव्हाण यांनी कठीण असा निर्णय आपल्याला घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे. टाटा ग्रुप बिस्लेरीची जबाबदारी अत्यंत योग्यपणे निभावतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.