प्रतिनिधी / फोंडा
फोंडा नगरपालिकेतर्फे घरपट्टी व व्यावसायिक घरपट्ठी वाढविण्याचा निर्णय एका नगराध्यक्षांचा नसून संपूर्ण पालिका मंडळाचा आहे. सर्व नगरसेवकांनी एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे. जर कुणाचा त्याला आक्षेप असेल तर या ठरावी प्रत व तशी नोटीस पालिकेसमोर लावली जाईल. आपल्या सूचना व हरकती त्यांनी नोंदवाव्यात असा खुलासा नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केला आहे.
फोंडा पालिकेतर्फे घरपट्टी 7 रुपयांवरुन 15 रुपये तर व्यावसायिक घरपट्टी 20 रुपयांवरुन 100 रुपये तसेच नवीन बांधकामावरही मोठय़ाप्रमाणात कर वाढविण्याच्या निर्णयावर डॉ. केतन भाटीकर यांनी नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याला उत्तर देताना जे अद्याप नगरसेवकही बनलेले नाहीत, त्यांनी पालिकेचा कारभार आम्हाला शिकवू नये अशा शब्दात रितेश नाईक यांनी निशाणा साधला. पालिकेची एकंदरीत आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पालिका मंडळाच्या संमतीनेच हा निर्णय घ्यावा लागला. सध्या पालिकेच्या बँक खात्यात केवळ रु. 23 लाख शिल्लक आहेत. कर्मचारी व कामगारांच्या पगारावरच साधारण अडीच कोटी व कचरा व्यवस्थापनावर दरमाही एक कोटी रुपये खर्च येतो. याशिवाय इतर खर्च वेगळे आहेत. सध्या जी करवाढ केली आहे, ती राज्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत जास्त नाही. 2016 मध्ये बांधकाम खात्याने अधोरेखीत दरानुसारच नवीन कर लागू केला आहे व तो दिवाळीत नव्हे येत्या मार्चपासून अंमलात येईल. या करातून गोळा होणारा पैसा फोंडा पालिका क्षेत्राच्या विकासासाठी तसेच व्यापारी व नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठीच खर्च होणार आहे. सध्या पालिका आर्थिक अडचणीत असून निधीचाही तुटवडा असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. मात्र काही लोक या गोष्टींचा विचार न करताच जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही रितेश नाईक यांनी केला आहे.
व्यापारी व नागरिकांना विश्वासात घ्या व मगच करवाढ करा : डॉ. केतन भाटीकर
दरम्यान रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडा पालिकेने सामान्य नागरिक व व्यापाऱयांवर टाकलेला करांचा बोजा येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत मागे घेण्याचा इशारा दिला आहे. या मुद्दय़ावर त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. आधीच कोरोनामुळे व्यापारी व सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यात पालिकेने भरमसाठ घरपट्टी व व्यावसायिक घरपट्टी तसेच नवीन बांधकाम कर वाढवून त्यांना जेरीस आणले आहे. पालिका खरोखरच अर्थिक अडचणीत असल्यास नगराध्यक्षांनी आधी अनेक वर्षांची थकबाकी वसूल करावी तसेच इतर वायफळ खर्च कमी करावा. सध्या जनता महामाईमुळे होरपळत आहे. त्यात आता कराचा हा अतिरिक्त भार टाकला असून हाच काय तो ‘सबका साथ, सबका विकास’ असा टोलाही त्यांनी लगावला. पालिकेने कर जरुर वाढवावा, पण त्यापूर्वी फोंडय़ातील व्यापारी फोरम व जाणकारांना विश्वासात घ्यावे व त्यानंतरच योग्य प्रमाणात करवाढ करावी अशी मागणी डॉ. भाटीकर यांनी केली आहे.