ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मार्ग काढत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरही हे कर्मचारी घरातून काम करतील. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम म्हणाले, कोरोना संकटामुळे जगभरातील छोटे- मोठे उद्योग आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने यावर मार्ग काढत आपल्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कंपनीत जवळपास 3 लाख 55 हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे. तर 20 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करणार आहेत. या योजनेला त्यांनी ‘मॉडेल 25’ असे नाव दिले असून, कंपनी हा प्रयोग सुरुवातीला 2025 पर्यंत करुन पाहणार आहे. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर पुढे ही योजना तशीच सुरू ठेवता येणार आहे.