इस्लामाबाद / वृत्तसंस्था
‘जेथे चहा आहे, तेथे आशा आहे’ अशी एक म्हण आहे. मात्र पाकिस्तानमध्ये सध्या चहाची मोठय़ा प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे पाकिस्तानच्या भवितव्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत, असेही बोलले जात आहे. या देशात सध्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हती एवढी चहाची कमतरता आहे.
पाकिस्तामध्ये चहाच्या एका कपाची किंमत हॉटेलांमध्ये 50 रुपयांहून अधिक झाल्याचे बोलले जात आहे. टपरीवरचा चहाही 25 रुपये कप या भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षभरात चहाच्या दरात 27.5 टक्के वाढ झाली. त्यामुळे आता चहा सर्वसामान्यांच्या दृष्टीने चैनीची वस्तू बनला असल्याचे दिसून येते.
चहा कमी पिण्याचे आवाहन
पाकिस्तानचे नियोजन मंत्री एहसान इक्बाल यांनी पाकिस्तानच्या जनतेला चहा पिण्याचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केले आहे. चहा कमी प्यायल्यास प्रकृती सुदृढ राहते, अशी जाहीरात केली जात आहे, अशी सूत्रांची महिती आहे. तथापि, पाक जनता मात्र या चहा टंचाईसाठी ते आपल्या राष्ट्रीय सरकारलाचे दोष देत आहेत. सरकारबद्दल प्रचंड नाराजी यामुळे निर्माण झाली आहे.