प्रतिनिधी /खानापूर
अनादी काळापासून शिक्षण ही प्रक्रिया सुरू असून ती कायमच सक्रिय राहणार आहे. महाभारतातील कृष्ण असो किंवा शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यासह ज्या महान व्यक्ती झाल्या. त्यांच्या मागे गुरुंचीच प्रेरणा होती. आजही समाजाचे दिशादर्शक शिक्षक आहेत. आजच्या वैज्ञानिक युगात शिक्षकावर फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पार पाडणे आमचे कर्तव्य आहे. शिक्षकांवर समाजाचे जडणघडण असते. शिक्षकांनी याची जाणीव ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन लक्ष्मण कोणे यांनी खानापूर येथे शिक्षक दिनानिमित्त केले.
येथील शुभम गार्डनमध्ये शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शंभोलिंग शिवाचार्य महास्वामी, उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, तहसीलदार प्रवीण जैन, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी राजेश धनवाडकर, गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. अशोक अंबगी यांनी प्रास्ताविक करुन स्वागत केले.
यावेळी डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक व नैतिकेचे धडे शिक्षकानी विद्यार्थ्यांना द्यावेत, असे ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच एनजीओ व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शैक्षणिक खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील निवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.