मते बाद होण्याच्या आकडय़ाने शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह : पदवीधर, शिक्षक निवडणुकीत तब्बल 9 हजार 6 मते अवैध
प्रतिनिधी / बेळगाव
भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. यामध्ये मतानुसार सरकार निवडले जाते. विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वसामान्य व्यक्ती मतदान करत असतात. मात्र पदवीधर आणि शिक्षक मतदार प्रक्रियेत हे शिक्षण घेतलेले सुशिक्षित मतदार मतदान करत असतात. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बाद झालेल्या मतांचा आकडा पाहता खरोखरच हे पदवीधर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
या मतांच्या आकडेवारीवरून शिक्षण व्यवस्था कोठे चालली हेच समजणे अवघड झाले आहे. वायव्य शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण 21 हजार 402 मतदान झाले. त्यामध्ये तब्बल 1270 शिक्षकांची मते बाद ठरविण्यात आली आहेत. यामुळे जो निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणारा सुशिक्षित घटक आहे त्यांचीच मते इतक्मया मोठय़ा संख्येने बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी कशामुळे बाद झाली, त्यांना मतदानाबाबत जनजागृत करण्यात आले होते की नाही? अशा विविध चर्चा सध्या सुरू आहेत.
शिक्षकांबरोबरच पदवीधरांनीदेखील वायव्य पदवीधर उमेदवारांसाठी मतदान केले आहे. एकूण 65 हजार 922 इतके मतदान झाले. त्यामध्ये तब्बल 9 हजार 6 मते अवैध ठरविण्यात आली. ही बाबदेखील गंभीर आहे. 9 हजार पदवीधरांना मतदान करता आले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पदवी घेतलेल्यांनाच या मतदान प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाते. मात्र पदवी घेतलेलेच जर मतदान करताना चुकत असतील तर त्यांनी खरोखरच पदवीधर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच हा आकडा पाहता शिक्षणाचा दर्जा घसरला आहे का? याचाही कोठे तरी विचार होणे गरजेचे आहे.
वायव्य शिक्षक आणि पदवीधर संघाबरोबरच पश्चिम शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक पार पडली. एकूण 15 हजार 583 मतदान झाले. त्यामध्ये तब्बल 1223 शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केले. त्यामुळे त्यांची मते अवैध ठरविण्यात आली. ही बाबदेखील गंभीर आहे. केवळ 15 हजारमध्ये 1200 हून अधिक शिक्षकांची मते बाद होतात. यामुळे हा आता चिंतनाचा विषय बनला आहे.
गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
विधानसभा, लोकसभेमध्येदेखील मते बाद होतात. मात्र त्यामध्ये शाळेला न गेलेले मतदान करतात. मतदान करताना त्यांच्याकडूनही चूक होते. मात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून इतक्मया मोठय़ा प्रमाणात मतदान चुकीच्या पद्धतीने झाल्याने हा एक आता चर्चेचा विषय बनला आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक आयोगानेही आता शिक्षकांना आणि पदवीधरांना मतदान करण्याबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.