वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत बिहारमध्ये रालोआला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळालेली असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱया राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव चिंताग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यांचे पिता आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पक्षफुटीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. बिहार विधानसभेत रालोआचे 125 सदस्य आहेत. त्यापैकी एकाने मतदान केले नाही. त्यामुळे मुर्मूंना येथून 124 मते मिळणे अपेक्षित होते. तथापि, प्रत्यक्षात 9 मते अधिक मिळून 133 मते मिळाली. याचाच अर्थ असा, की विरोधी पक्षांची 9 मते फुटली आहेत. ती नेमकी कोणाची? यावर आता राजकीय वाद रंगला आहे.
बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी राजदच्या दुखऱया नसेवर बोट ठेवले आहे. भाजपमध्ये राजदपेक्षा अधिक अनुभवी आणि जनतासन्मुख नेते आहेत. केवळ विधानसभा निवडणुकीत 75 जागा जिंकल्या म्हणून तेजस्वी यादव यांनी तोरा दाखवू नये. त्यांचा प्रभाव ओसरत असून त्यांच्याच पक्षाचे आमदार आता भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला.