बीआरएस आमदारांच्या कथित घोडेबाजाराचा तपास सीबीआयकडे ः एसआयटीला दिली स्थगिती
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणा उच्च न्यायालयाने बीआरएस आमदारांच्या कथित घोडेबाजाराच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. तसेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून स्थापन विशेष तपास पथक रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते. तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे.
उच्च न्यायालयाने बीआरएस आमदारांच्या कथित घोडेबाजाराच्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपविला आहे. उच्च न्यायालयाने एसआयटीही रद्द करण्याचा निर्णय दिला असून आम्ही याचे स्वागत करतो असे उद्गार भाजप नेते रामचंद्र राव यांनी काढले आहेत.
30 ऑक्टोबर रोजी तेलंगणा पोलिसांनी सत्तारुढ पक्षाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखविल्याप्रकरणी रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, नंद कुमार आणि सिंहयाजी स्वामी यांना अटक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासमवेत 7 जणांवर आरोप ठेवले आहेत. तेलंगणा भाजपने याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती.