एसपीएम रोडवरील आरओ प्लांटसमोर ठेवल्या मोठय़ा पाईप : पाणी घेण्यास अडथळाः नागरिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. पण देखभालीअभावी पाणपोई बंद अवस्थेत आहेत. सध्या शुद्ध पाण्याची मागणी असल्याने स्मार्ट सिटीत आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली. पण हे प्लांट सध्या बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. एसपीएम रोडवरील आरओ प्लांटजवळच मोठय़ा पाईप ठेवल्या आहेत. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने पाणी कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला
आहे.
पाणीपुरवठा नियोजन कोलमडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले आरओ प्लांट (जलशुद्धीकरण यंत्र) बंद असल्याने कुचकामी ठरले आहेत. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरवासियांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात आरओ प्लांट उभारण्यात आले आहेत. मात्र, पाण्याअभावी हे आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने नागरिकांनी आरओ प्लांटकडे धाव घेतली. पण आरओ प्लांटमध्येदेखील पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
खरी गरज पाणी टंचाईच्या काळातच
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून धर्मवीर संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, श्रीनगर गार्डन, न्यायालय आवार, गोवावेस अशा विविध ठिकाणी आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. पण पाणी टंचाईच्या काळातच पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. प्लांटची देखरेख करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराची आहे. पण प्लांट उभारणी केलेल्या सहा महिन्यातच ते बंद पडू लागल्याने भवितव्य काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानासमोर आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. पण सदर प्लांट सध्या बंदच असून प्लांटच्या समोर मोठमोठय़ा पाईप ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी पाणी घेण्यासाठी जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. प्लांटकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पाणी कसे घ्यायचे. असा मुद्दा उपस्थित झाला आहे.