बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱयांची कैफीयत : जिल्हाधिकाऱयांना मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेतवडीत पाणी साचून पिकाचे नुकसान झाले. याचबरोबर काही घरांमध्ये पाणी शिरूनही नुकसान झाले आहे. तेव्हा तातडीने शेतकऱयांना प्रतिएकर 1 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
बळ्ळारी नाला हा दरवषीच शेतकऱयांना त्रासाचा ठरत आहे. बळ्ळारी नाला परिसरातील भातपीक दरवषीच कुजून जात आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे जवळपास 1 हजारहून अधिक एकरमधील भातपीक खराब झाले आहे. बळ्ळारी नाल्याची व लेंडी नाल्याची खोदाई करावी, यासाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱयांना फटका बसत आहे.
केवळ भातपीकच नाही तर चारादेखील खराब होत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्नही गंभीर बनत आहे. येळ्ळूरपासून सुरू झालेला नाला हा सर्वांसाठीच त्रासाचा ठरत आहे. येडियुराप्पा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि बसवण कुडचीजवळील पुलाखाली कचरा साचला आहे. तो काढल्यास पाण्याचा निचरा झाला असता. मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
बळ्ळारी नाल्याबरोबरच लेंडी नाल्याचीही खोदाई होणे गरजेचे आहे. कारण हा नालाही फुटून शिवाराचे नुकसान होत आहे. तेव्हा सरकारने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, मारुती सावंत, पारिश जनगौडा, सुभाष शेरी, दीपक मुदकण्णावर, बसवंत पाटील, इराप्पा अष्टेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया…
खोदाईमुळे पुराचा फटका कमी : नारायण सावंत
लेंडीनाला दुरुस्त करावा, या मागणीसाठी आम्ही वारंवार महापालिका आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर काही प्रमाणात या नाल्याची खोदाई करून दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे यावषी बेळगाव शहराला पुराचा फटका कमी बसला आहे. याचा सारासार विचार करून लेंडीनाला तसेच बळ्ळारी नाल्याची खोदाई केल्यास शेतीचे किंवा शहराचे पुरापासून नुकसान होणार नाही.
शेतकऱयांच्या समस्येकडे लक्ष द्या : मारुती सावंत
दरवषीच बळ्ळारी नाला आणि लेंडीनाल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. तेव्हा आम्हाला कायमस्वरूपी या त्रासातून मुक्त करावे. दरवषी शेतामध्ये पेरायचे, त्यानंतर काहीच उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. तेव्हा शेतकऱयांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
शेतकऱयांच्या समस्या सोडवा : दीपक मुदकण्णावर
पाऊस आला की शेतीचे नुकसान ठरलेलेच. गेल्या चार वर्षांपासून आमचे नुकसान होत आहे. तेव्हा साऱयांनीच याचा विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ ‘विकास केला’ असे दाखविण्यापेक्षा शेतकऱयांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवा.