क्रांतीदिन सोहळय़ात मंत्री रवी नाईक यांचे आवाहन
प्रतिनिधी /फोंडा
गेल्या साठ वर्षात गोवा राज्याने विविध क्षेत्रात जी प्रगती साधली, ते येथील मुक्तीमुळेच शक्य झाले. त्यामागे स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व बलिदान आहे. मुक्तीलढय़ाचा हा इतिहास नवीन पिढीला योग्य प्रकारे समजावून सांगणे गरजेचे आहे, असे उद्गार कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथील शासकीय क्रांतीदिन सोहळय़ात बोलताना काढले. भविष्याची वाटचाल करताना, सामाजिक सलोखा राखून कुठल्याच जाती धर्मामध्ये फरक न करता माणूस म्हणून प्रत्येक घटकाचा उत्कर्ष साधावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
फोंडा येथील क्रांती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून मुक्तीलढय़ातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, पोलीस उपअधीक्षक सी. एल. पाटील, मामलेदार श्री. दलाल तसेच इतर सरकारी अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रगीतानंतर फोंडा पोलीस पथकातर्फे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. गोव्याच्या विकासामध्ये केंद्रातील मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण वाटा असून आज जे रस्ते, पूल व अन्य साधनसुविधा निर्माण झाल्या त्यात केंद्राच्या सहाय्याने असे रवी नाईक पुढे म्हणाले. फोंडा येथील क्रांती मैदानाची उर्वरीत जागा फोंडा पालिकेच्या ताब्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. या पूर्वी आपण मुख्यमंत्री असताना सैन्य दलाकडे असलेली अर्धी जागा मिळविली होती. राज्य सरकार व सैन्य दलात या जागेविषयी यापूर्वीच लेखी करार झाला असून उर्वरित जागा फोंडा पालिकेच्या ताब्यात मिळाल्यानंतर विविध सुविधा असलेले प्रशस्त असे उद्यान उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल ढवळी, जुना बाजार सरकारी हायस्कूल फोंडा या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तर लोकविश्वास प्रतिष्ठाच्या विशेष मुलांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.