144 कलमाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक फिरकले नाहीत, पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी
प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्यातील नियोजित आयआयटीला शेतकऱयांच्या विरोधानंतर प्रशासनाने मंगळवारी प्रस्तावित सुविधेच्या सीमेच्या 200 मीटरच्या आंत 144 कलम लागू केले. त्यानुसार कोठार्ली ग्रामच्या सीमांकन केलेल्या जागेपासून 200 मीटरच्या परिघात पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास आणि जमाव करण्यास सक्त मनाई आहे. या ठिकाणी सध्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बुधवारी आंदोलक फिरकले नाहीत. असे असले, तरी सांगे पोलिसांनी दोन आंदोलकांना बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सांगेत आयआयटी प्रकल्पावरून वातावरण गेले चार दिवस बरेच गरम झाले होते. सांगे येथे आमच्या शेतजमिनीत आयआयटी नको या मागणीवर विरोधक ठाम आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार असलेले समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने सांगे-कोटार्ली येथे आयआयटी प्रकल्प होऊ घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित प्रकल्पासाठीच्या सीमांकनाचे काम सोमवारीच पूर्ण झाले आहे.
सोमवारी चिंच, वरकटो येथे सर्वेक्षण करणाऱया कर्मचाऱयांचा रस्ता आंदोलक शेतकऱयांनी रोखून धरला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होऊन त्यात काही महिला आंदोलक जखमी झाल्या होता. आयआयटी नको अशी भूमिका घेतलेल्या आंदोलकांपैकी जोसेफ फर्नांडिस याला मंगळवारी सकाळी 6.30 वा. पोलिसांनी अटक केली होती, तर अन्य तिघांना वॉरंट बजावले होते. बुधवारी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आंदोलकांकडून संताप व्यक्त होत आहे.
144 कलम लागू केल्यामुळे लोकांना संबंधित परिसरात सभा घेण्यास तसेच एकत्र येण्यास बंदी आहे. त्यामुळे शेतामध्ये प्रवेश करणाऱया रस्त्यावर पोलिसांचा कडक पहारा असून बुधवारी सर्व वातावरण शांत होते. असे असले, तरी जमिनीच्या सीमांकनावरून शेतकऱयांत कमालीचा संभ्रम आहे. सरकारने शेतकऱयांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सरकार आंदोलक शेतकऱयांशी चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पुढे काय होते त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.