गृहमंत्र्यांचा इशारा : देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर डेटाबेस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दहशतवाद हा मानवी हक्क उल्लंघनाचा सर्वात मोठा प्रकार आहे. लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ते मुळापासून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीत केंद्रीय गृह मंत्रालय दहशतवादप्रश्नी मुळीच तडजोड करणार नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यांमुळे तेथील दहशतवादाला आळा घालण्यात मोठी मदत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी धोरण आखत असल्याचेही त्यांनी एनआयएच्या 13 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली. केंद्र सरकार देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. या डेटाबेसमध्ये बॉम्बस्फोट, दहशतवादासाठी फंडिंग, बनावट चलन, अंमली पदार्थ, हवाला, शस्त्रास्त्रांची तस्करी अशा गुह्यांचा समावेश असेल. हा डेटाबेस केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिसांना वेगवेगळय़ा तपासकार्यात मदत करण्यासाठी महत्वाचा असणार आहे, असे शहा यांनी सांगितले.
तपासाला मिळणार गती
केंद्र सरकार तयार करत असलेल्या डेटाबेसमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील केंद्रीय संस्था आणि पोलिसांना तपासात मदत होईल. एनआयए, केंद्रीय दहशतवादविरोधी तपास संस्था, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड आणि इंटेलिजन्स ब्युरो यावर काम करत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.