राष्ट्रीय सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलण्याची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या आर्थिक संकटावरून महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एखाद्या देशाचा मुख्य उद्योग दहशतवाद असेल तर तो अवघड स्थितीतून बाहेर पडत समृद्ध शक्ती होऊ शकत नाही असे जयशंकर यांनी विदेश मंत्रालयाकडून आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. पाकिस्तानसोबत संबंधांमध्ये दहशतवाद हाच मूलभूत मुद्दा आहे. चीनसोबत आमच्या संबंधांमध्ये आर्थिक आव्हाने प्रत्यक्षात अत्यंत गंभीर आणि विक्राळ आहेत. चीनसोबत व्यापार असंतुलनाची जबाबदारी केवळ सरकारची नसून व्यावसायिक अन् उद्योजकांची असल्याचे जयशंकर म्हणाले.
स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संरक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलण्याची तयारी असलेला देश म्हणून भारताच प्रतिमा आता निर्माण झाली आहे. प्रयेक देशासमोर स्वतःची अशी आव्हाने आहेत आणि कुठलेही आव्हान राष्ट्रीय सुरक्षेसमान महत्त्वपूर्ण नसते असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत. जर मला कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असल्यास मी जनतेच्या भावना काय आहेत हे पाहिन. सर्वप्रथम लोक त्यासंबंधी काय विचार करतात हे पाहण्याचा प्रयत्न करेन. पाकिस्तानला मदत करण्यासंबंधी लोकांच्या भावना काय आहेत हे बहुधा सर्वांनाच माहित असावे असे विधान जयशंकर यांनी केले आहे.
दीर्घकाळापासून कसोटी
भारत आता एक असा देश आहे, ज्याला तुम्ही कुठूनही बाहेर काढू शकत नाही तसेच तो एका मर्यादेपेक्षा अधिक सीमा ओलांडूही देणार नाही. मागील काही वर्षांमध्ये आमच्या पश्चिम सेमवर दीर्घकाळापासून परीक्षा घेतली जात आहे. परंतु स्थिती आता काहिशी वेगळी आहे आणि सर्व लोक या बाबत सहमत असतील असे मी समजतो. काही गोष्टी 2016 ते 2019 दरम्यान घडल्या असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
जागतिक आवाज
रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, आमची स्वतंत्र भूमिका पडताळून पाहण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आम्हाला एक स्वतंत्र आणि इतरांच्या अधिकारांसाठी उभे राहणारी शक्ती म्हणून पाहिले जातेय. तसेच आम्ही जागतिक आवाज ठरत आहोत असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
गंभीर आर्थिक संकटात पाकिस्तान
पाकिस्तान विदेशी कर्जाची परफेड करण्यास असमर्थ ठरण्यासह गंभीर आर्थिक संकटात सापडताना दिसून येत आहे. पाकिस्तान आता श्रीलंकेप्रमाणेच आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे विश्लेषकांचे सांगणे आहे. पाकिस्तान यापूर्वीच कर्जाचा हप्ता भरण्यास असमर्थ ठरल्याची टिप्पणी तेथील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी केली होती.