श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱया काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम नावाच्या संघटनेने धमकी दिली आहे. ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा’, असा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. काही दिवासांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, काश्मिरी पंडितांची योग्य काळजी घेतली जाणार असल्याचा निर्वाळा उपराज्यपालांनी दिला आहे.
लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱया काश्मिरी पंडितांना धमकी दिली आहे. कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून एक पत्र लिहिण्यात आले आहे. ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी काश्मीर सोडून जावे, अन्यथा मरायला तयार व्हा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्राईल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट केली, तरीही तुम्ही मरणार’ अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ातच जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची कार्यालयात घुसून हत्या केली होती. राहुल यांची हत्या हे स्थलांतरित कामगार आणि खोऱयातील स्थानिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणाऱया दहशतवादी हल्ल्यांचे नवे प्रकरण आहे. यापूर्वी गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये पाच दिवसांत सात नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यात एक काश्मिरी पंडित, एक शीख आणि दोन गैर-स्थानिक हिंदूंचा समावेश होता. याशिवाय काश्मिरी पंडितांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. विशेष म्हणजे गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये खोऱयात टार्गेट किलिंगचे सत्र सुरू झाले होते. दहशतवाद्यांच्या नव्या भ्याड कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. यासोबतच फुटीरतावादी समर्थकांवर मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.