अंतराळासाठीच्या मानवी मोहिमेचे भारताचे स्वप्न लवकर पूर्ण होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची पहिली मानवयुक्त अंतराळमोहीम ‘गगनयान’ 2024 मध्ये प्रक्षेपित होण्याची अपेक्षा असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी म्हटले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 2022 साठी मानवयुक्त अंतराळ मोहिमेची योजना आखली होती. परंतु कोरोना महामारीमुळे योजनेच्या अंमलबजावणीला विलंब होणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी नमूद केले आहे.
कोरोना महामारीमुळे रशियासोबत भारतातही अंतराळवीरांच्या प्रशिक्षणावर प्रभाव पडला आहे. गगनयान मोहिमेचे पहिले परीक्षण उड्डाण चालू वर्षाच्या अखेरीस होणार आहे. पहिल्या परीक्षण उड्डाणानंतर अंतराळात ह्युमनॉइड रोबोट व्योममित्राला पुढील वर्षी अंतराळाच्या बर्हिगत कक्षेत पाठविण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.
भारतीय वायुदलाने मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी संभाव्य अंतराळवीर म्हणून 4 लढाऊ वैमानिकांची निवड केली होती. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दोन कक्षीय परीक्षण उड्डाणांच्या परिणामांचे अध्ययन केल्यावर 2024 मध्ये किमान 2 अंतराळवीरांना पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठविणार असल्याची माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
परीक्षण मोहिमेदरम्यान अंतराळयान 15 किलोमीटरच्या उंचीवर प्रक्षेपित करण्यात येईल. दुसरे कक्षीय परीक्षण उड्डाण गगनयान क्रू कॅप्सूलला अधिक उंचीवर नेणार आहे. पुढील वर्षी चांद्रयान-3 मोहीम साकारण्याची इस्रोची योजना आहे.