दोन खटल्यांची सुनावणी पुढे ढकलली : कार्यकर्त्यांना वॉरंट, जामीनदारांना नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी न्यायालयात सुरू असून बुधवारी तीन खटल्यांची सुनावणी होणार होती. यामधील एका खटल्यामध्ये तिघांच्या साक्षी झाल्या आहेत तर दोन खटले पुढे ढकलले असून जामीनदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
येळ्ळूरचा खटला क्रमांक 794/15 मध्ये तिघांची साक्ष पार पडली. चंद्रू गोपाळ सुगंधी, श्रीकांत यमनाप्पा कुबकड्डी (दोघेही रा. सदाशिवनगर) आणि प्रवीण भालचंद्र शिंदे (रा. कंग्राळ गल्ली, बेळगाव) यांनी साक्ष दिली आहे. त्यामुळे आता या खटल्याच्या सुनावणीला गती मिळणार आहे.
येळ्ळूरच्या 166/15 खटल्यातील कार्यकर्ते हजर झाले नाहीत. त्यामुळे सुधीर परशराम धामणेकर, हणमंत फकिरा धामणेकर, प्रशांत शंकर टक्केकर, मनोहर यल्लाप्पा मजुकर, सूरज यल्लाप्पा घाडी यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यांना जामीन असलेल्या जामीनदारांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील तारखेला या कार्यकर्त्यांना घेऊनच न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश दिले आहेत. खटला क्रमांक 122/15 यामधील मनोहर भैरू गुंडेकर, नारायण बाबू कंग्राळकर, अनंत विष्णू पाटील हे कार्यकर्ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांनाही वॉरंट बजावून जामीनदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
बुधवारी एकूण तीन खटल्यांची सुनावणी होती. त्यामधील एका खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून वरील तिघांनी साक्ष दिली आहे. आता पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर हे काम पाहत आहेत.