जळगाव / प्रतिनिधी :
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सत्तेसाठी आपले हिंदुत्व सोडून काँग्रेस धार्जिणे झाले, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
बावनकुळे म्हणाले, राहूल गांधी सावरकरांचा अपमान करतात. आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधींना मिठय़ा मारतात. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी आदित्यला माफ केले नसते. केवळ सत्तेच्या लोभापायी उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार स्विकारले. आता केवळ पक्षाची घटना बदलणे बाकी आहे. सामनात काँग्रेस राष्ट्रवादीची स्क्रिप्ट लिहून येते. ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसमोर लोटांगण घालतात. शरद पवारांनी ठाकरेंचा बुद्धीभ्रम केला असून, शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे. हिंदुत्ववादी विचार उध्दव ठाकरेंनी त्याग केल्याची टीका करत स्वातंत्रयवीर सावरकरांच्या अपमानाची चिड असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
अधिक वाचा : पुण्यात कोश्यारींविरोधात राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन
उध्दव ठाकरे यांनी आपल्या दोन वर्षाच्या काळात कधीही उद्योजकांशी संवाद साधला नाही, चर्चा केली नाही. 18 महिने मंत्रालयात आले नाहीत. त्यांना उदयोगांशी काही देणेघेणे नव्हते. उद्योग आणण्यासाठी उदयोजकांशी संवाद साधून अडचणी सोडवणे महत्वाचे आहे. मात्र, उध्दव ठाकरे यांनी एकही बैठक घेतली नाही. उद्योगासाठी पोषक वातावरणच निर्माण केले नाही. अशा स्थितीत महाराष्ट्रात उद्योग येतील तरी कसे? असा सवाल करत ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे राज्यातून उद्योग बाहेर गेल्याचेही त्यांनी सांगितले.