महाराष्ट्रात गेल्या 8 महिन्यांपासून वेगवान राजकीय घडामोडी होत आहेत़ वेगवेगळे राजकीय पक्ष एकमेकांना शह काटशह देत आहेत़ न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणीदेखील केली गेली आह़े या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणे आवश्य आह़े पत्रकार परिषदा घेतल्या तरी लोकांमध्ये उतरून त्यांच्याशी विविध मार्गांनी संवाद साधण्याचे आणि प्रतिसाद मिळवण्याचे काम केले तरच राजकीय पक्षांना जनमानसाचा पाठिंबा मिळेल़ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच खेड येथे सभा घेतल़ी या सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली आणि त्याला माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार उत्तर दिल़े राज्याचे भावी राजकारण वेगळ्dया वळणावर पोहोचणार असल्याचे संकेत मिळाल़े
रत्नागिरी जिह्यातील खेड येथे गोळीबार मैदानात रविवारी सायंकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व निवडणूक आयोगावर त्यांनी टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंदे तर निवडणूक आयोगाचा ‘चुना लगाव’ असा उल्लेख करत निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला नसेल तर गोळीबार मैदानात येऊन खरी शिवसेना कुणाची आहे, हे पहावे असा हल्लाबोलही केला. निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसल्याचेही ठणकावले.
ते म्हणाले, शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली असून निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी केलेली नाही. यामुळे निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करण्याचा प्रयत्न करू नये. निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर जो अन्याय करायचा होता, तो त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे चिन्ह बदलले असले तरी अंधेरीचा गड राखला, असेही
सांगितले.
माझ्या आई-वडिलांचे नाव बाजूला ठेवून पक्षबांधणी करून दाखवा, असे आवाहनही दिले. भाजपच्या मागे बाळासाहेब नसते तर भाजपचे काय झाले असते? असा सवाल उपस्थित करत भाजपच भ्रष्टाचाराचे खरे कुरण असल्याचा आरोपही केला. मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे येत होते. पण, सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवून राज्यातील तरूणांच्या नोकऱ्या हिरावून घेण्याचे पाप करत आहेत.
कोकणातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम करत भरपूर काही दिले. आजघडीला माझ्याकडे देण्यासारखे काहीही नसून हात रिकामेच आहेत. मात्र, जनता माझ्या सोबत असल्याचे आजच्या विराट सभेने दाखवून दिले. यापुढेही अशीच साथ द्या, अशी भावनिक सादही घातली.
मी घरात बसून पण महाराष्ट्र सांभाळला. पण सध्याचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर मुजरे करत बसले आहेत. गुजरातला पटेल चोरले, बंगालमध्ये सुभाषबाबू चोरले, इकडे बाळासाहेब चोरले. या चोरांच्या पाशवीवृत्तीला मत देणार का? असा सवालही उपस्थित करत हिम्मत असेल तर गद्दारांनी धनुष्यबाण घेवून मैदानात यावे, मी मशाल घेवून येतो. जनता ठरवेल तो कौल मान्य असेल, असे सूचित करत 2024 च्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, असे आवाहनही शेवटी केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर माजी मंत्री रामदास कदम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल़ी ठाकरे गटाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेतील आरोपांना सोमवारी पत्रकार परिषदेत रोखठोक उत्तरे दिली. शरद पवार व सोनिया गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करणारे उद्धव ठाकरेच खरे गद्दार असल्याचा हल्लाबोलही चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जीभ हासडण्याची हिंमत तरी आहे का? असा सवालही उपस्थित केला.
मुंबई, पुणे, ठाणेसह अन्य ठिकाणाहून भाड्याची माणसे आणून कितीही प्रयत्न केले तरी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कोणीही संपवू शकत नाही. एकदा नव्हे तर शंभरवेळा उद्धव ठाकरे येथे आले तरी पराभूत करू शकत नाहीत, असे ठणकावत जितक्या वेळा येतील, तितके अधिक मताधिक्य वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. गोळीबार मैदानात झालेल्या सभेत स्थानिक लोक किती होते? असा प्रश्नही उपस्थित केला.
धनुष्यबाण चोरल्याचा आरोप करणाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्यामुळेच धनुष्यबाण त्यांना मिळाले नाही, अशी टीका करत तिकीट कापण्यासाठी पैसे घेणाऱ्यांच्या हातात पवित्र धनुष्यबाण शोभेल का? असा घणाघातही केला. उद्धव ठाकरेच खोक्यांमध्ये अडकले असून एकातरी आमदाराने पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हानही दिले आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा असला तरी अनेक चेहरे त्यांच्यामध्ये लपलेले असल्याची खरमरीत टीकाही केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याच मैदानावर 19 मार्चला विराट सभा घेवून सडेतोड उत्तर देणार असल्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितल़े राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाल़े खेड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आणि यांच्या विरोधकांनी ठरवलेल्या सभेकडे स्थानिकच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणचे राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत़ सभांचे परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राजकीय पातळीवर होणार असल्याचे चित्र आह़े काही म्हटले तरी महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातील बंडाळी, न्यायालयीन निर्णय, कार्यकर्त्यांचा ओढा अशा सगळ्याच मुद्यांवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहणार आह़े राज्यपातळीवर अनेक आमदार विखुरले तसे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सामान्य कार्यकर्ते अद्याप वेगवेगळा झेंडा हाती घेतल्याचे दिसून येत नाहीत़ जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसे कोणते कार्यकर्ते कोणत्या पक्षात आहेत हेच स्पष्ट होईल़
सुकांत चक्रदेव