तब्बल सहा महिन्यांनंतर कामाला सुरुवात : नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
विजयनगर ते गणेशपूरला जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून अडचणीचा ठरू लागला होता. परिणामी हा रस्ता कोणाच्या हद्दीत येतो, यावरून मोठा गदारोळ माजला होता. परिणामी याबाबत आरटीई कार्यकर्ते नागेश माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे हा रस्ता कोण करणार? असा प्रश्न पडला असतानाच हा रस्ता आता स्मार्टसिटी योजनेतून करण्यात येत आहे. मात्र, या रस्त्याचे काम संथगतीने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
पंचायतराज खात्याकडे सदर तक्रार सोपविली होती. विजयनगर-गणेशपूर पाईपलाईन रोड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. येथून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हा रस्ता हिंडलगा ग्राम पंचायतकडे येतो, असे सांगून महानगरपालिकेने हात वर केले होते. ग्राम पंचायतीने हा रस्ता आपल्या हद्दीत येत नसून महानगरपालिकेच्या हद्दीत येतो, असे सांगितले. त्यामुळे हा रस्ता नेमका कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता या रस्त्याचे काम स्मार्टसिटी योजनेतून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या रस्ता परिसरात शाळा आहेत. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत होता. हद्दीचा वाद सोडून हा रस्ता तातडीने करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत होती. सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता 7 ते 8 वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, आरटीआय कार्यकर्ते नागेश माने यांनी याबाबत पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.