पुणे / प्रतिनिधी :
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा आम्हाला मान्य नाही. त्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा लागलाच पाहिजे, अशी सूचना मी पोलीस आयुक्तांना केली आहे. पीएफआय तपास हा सातत्याने पुरावे गोळा करून करण्यात आला. मी गृहमंत्री असताना त्यांच्या कारवाया तपासत होतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. दरम्यान, दोन वेगवेगळय़ा प्रकारचे व्हिडीओ समोर आले असून, त्याची तपासणी होईल. पण महाराष्ट्रात पाकिस्तानचे नारे लावणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्स्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर पुणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, पीएफआयच्या कारवायाबाबत अनेक राज्यांनी तपास केला आहे. केरळ सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकावी, अशी मागणी केली आहे. पीएफआयच्या बंदीबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.
अधिक वाचा : PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय, भाजपचे ज्येष्ठ नेते
वेदांता-फॉक्सकॉनबाबत कोणीतरी येथे येवून आंदोलन केले. त्यांनी त्यांना जागाही दिली नव्हती, आम्ही ती दाखवली होती. आमच्या सरकारच्या शेवटच्या महिन्यात त्यांना येथून जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. आता मात्र काही लोक नाटक, नौटंकी करत आहेत. राज्यातील वातावरण आपण जोपर्यंत चांगले करीत नाही. तोपर्यंत गुंतवणूक येत नाही. ते वातावरण चांगले काम आम्ही करु. त्यातून गुंतवणूकीचे राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळख देवू. एमआयडीमध्ये त्रास देणाऱ्या माथाडयांवर लवकर कारवाई केल्याचे दिसून येईल, असे सांगून ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मेडीकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता का, याचा एका चिठ्ठीचा तरी पुरावा दाखवावा, ते अडीच वर्षे सत्तेत होते. त्यांनी या काळात काहीच न करता केवळ केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता मनात येईल ते बोलतात. रोज खोटे बोलल्यावर महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही. आम्ही हिमतीने महाराष्ट्रात गुंतवणूक आणली. यापुढेही आणणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.