12 वी परिक्षेच्या सुरवातीलाच प्रकार; विद्यार्थ्यांना 6 गुण मिळण्याची शक्यता; रत्नागिरी, सिंधुदुर्गातील 61 परीक्षा केंद्र
रत्नागिरी प्रतिनिधी
बारावी परीक्ष 21 फेब्रुवारीपासून सुरु झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून एकूण 26,423 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. इंग्रजीचा पहिला पेपरा दरम्यान ही परीक्षेची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले आहे. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्यायाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच पेपरच्या सुरूवातीला विद्यार्थी चांगलेच गोंधळात पडले. त्या प्रश्नांविषयी नेमके काय उत्तर लिहावे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला. ही बाब विद्यार्थ्यांनी निरिक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पेपरमध्ये ही मोठी चूक असल्याचे समोर आले.
इंग्रजी पेपर मधील पान नंबर 10 मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. येथे प्रश्न क्रमांक ए 3 इंग्रजी कवितेववर आधारित असणे अपेक्षित होते. पण याजागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती. ए 4 ला कवितेवर आधारित प्रश्न येणे अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. ए 5 हा प्रश्न देखील 2 गुणांचा होता. आणि येथे देखील प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना छापण्यात आल्या आहेत.
या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते. अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या. परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनाही प्रश्न पडला.
विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्याचे बोर्डाचे आश्वासन
यावर बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. प्रचलित पध्दतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा होवू शकलेली नाही. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी बाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा आयोजित करण्यात येईल. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन अनुराधा ओक (सचिव, राज्यमंडळ, पुणे) यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.