सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
पहिल्याच प्रयत्नात विजयी होऊन थेट विधानसभेत पोहोचणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. हा एक वेगळा अनुभव आहे. आमच्या पक्षाची ध्येयधोरणे इतरांपेक्षा वेगळी आहेत. आता आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी खांद्यावर आलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नाही म्हटले तरीही हा मतदारसंघ उपेक्षितच राहिला आहे. असंख्य कामे एकतर झालेली नाहीत किंवा अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करणे हे मोठे दिव्य असून त्यासाठी सतत कार्यरत राहणार आहे, असे मत सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी व्यक्त केले आहे.
गोवा आणि गोमंतकीयत्व जपण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ’रिव्होल्युशनरी गोवन्स’ पक्षाने पहिल्याच प्रयत्नात श्री. बोरकर यांच्या रुपाने स्वतःचा प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यात यश मिळविले. लोकचळवळीतून जन्मास आलेल्या या पक्षाला आता आपली ध्येयधोरणे थेट विधानसभेच्या माध्यमातून अधिकृत करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सांत आंद्रेबद्दलच बोलायचे झाल्यास आतापर्यंत येथील लोकांना आमदारापर्यंत जाण्यासाठी एक भीतीयुक्त दरारा होता. आज आपण लोकप्रतिनिधी बनल्यामुळे कुणीही सहज आपल्या दारी येऊ शकतो. त्यामुळे अखंड लोकांच्याच सहवासात राहावे लागत आहे. त्यातूनच गेल्या तीन महिन्यात कार्यकर्त्यांच्या सोबतीने निरंतर कार्यरत राहिलो आहे. आतातर ग्रामपंचायतीतील कामेसुद्धा लोक माझ्याकडे घेऊन येऊ लागले आहेत. यावरूनच आजपर्यंत येथील लोकांची काय स्थिती होती याची कल्पना तुम्हाला आली असेल, असे बोरकर म्हणाले.
सध्यस्थितीत साबांखा, रस्ते, भूमीगत वीज केबल, खाजन शेती, बांध-बंधारे यांची दुरुस्ती, मानसींचे दरवाजे मोडल्यामुळे होणारी शेतजमीनीची नुकसानी टाळणे यासारखी असंख्य अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. यातील बहुतेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून अनेक कामे प्रारंभ झाली आहेत. त्यातील बरीच पूर्णत्वाकडेही आलेली आहेत. सांत आंद्रे मतदारसंघात खाजन शेती हा एक मोठा विषय असून तो हाताळणे हे मोठे अवघड काम आहे. कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला हा विषयही सोडविण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे बोरकर म्हणाले.
मतदारसंघात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सरकारच्या असंख्य योजना आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. मात्र हे काम आजपर्यंत समाधानकारकरित्या झालेले नव्हते. परिणामी या मतदारसंघात बेरोजगारीची समस्या तशीच राहिली आहे. आता ते काम आम्ही हाती घेतले असून मतदारांना अधिकाधिक योजना आणि सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहे.
त्याशिवाय सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापने येथेही काही जणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. प्रसंगी त्यासाठी लागणारे कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्याची तयारी ठेवण्यात आली असून युवा पिढीला स्वयंसिद्ध बनविणे हे आपले ध्येय असेल. युवकांनी शेतीकडे वळावे यासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आकर्षित करणार, असे बोरकर यांनी सांगितले.
हे सर्व करताना अडचणी येत नाहीत, असा भाग नाही. काही ठिकाणी आजही माजी आमदाराचा कमी जास्त प्रभाव आहेच. त्यांचे अनेक कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांवरही आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आपले प्रयत्न चालूच आहेत. परंतु म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कामे अडून राहतात. मात्र तेसुद्धा एक दिवस आपल्या सोबत येतील व सर्वांच्या सहयोगातून तसेच आपला-परका असा कोणताही भेदभाव न करता संपूर्ण मतदारसंघाचा विकास घडविण्यात यशस्वी होईन, असे बोरकर म्हणाले.
मंडूर येथील गोमेकॉच्या ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत तीन वर्षांपूर्वी अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आली होती. तेथे ओपीडीही सुरु करण्यात आली होती. मात्र वरच्या मजल्यावरील वॉर्ड बंदच होते. आम्ही प्रयत्न केल्यानंतर आता ते वॉर्ड कार्यरत झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांची चांगली सोय झाली असून बांबोळी येथील गोमेकॉवर पडणारा भार कमी होण्यास मदत होणार आहे. अद्याप येथील काही युनिटस् अद्याप कार्यरत होणे बाकी आहेत. त्यांचाही पाठपुरावा करणार आहे.
आमच्या पक्षाची ध्येयधोरणे वेगळी असली तरीही मतदारसंघातील कामे करून घेण्यासाठी वावरत असतान सर्व स्तरांवर चांगले सहकार्य मिळत आहे. कोणत्याही अभियंता, अधिकाऱयाने अडवणूक, सतावणूक केलेली नाही. तरीही एखाद्याने अडवणूक केलीच तरी त्याच्या विरोधात आवाज उठवण्यास आपण सक्षम आहे, असे बोरकर म्हणाले.
मरिना प्रकल्पास विरोध ही आमची भूमिका कायम आहे. त्यासंबंधी दाखल केलेली याचिकाही न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांचे जीवनमान, येथील जैवसंवेदनशील भाग, पर्यावरण यांवर कोणता प्रभाव पडेल, स्थानिक मच्छिमार बांधवांवर काय परिणाम होईल, बेरोजगारीत कशी वाढ होईल, यासंबंधी वेळोवेळी आम्ही बोललो आहे. या प्रकल्प विरोधात खरे म्हणजे संपूर्ण गोव्यातील लोकांना आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, असेही श्री. बोरकर यांनी मत व्यक्त केले.
मतदारसंघात अखंडित पाणी, वीज पुरवठा, तरुणाईसाठी पंचायत पातळीवर परिपूर्ण क्रीडा प्रकल्प, यासारख्या लोकोपयोगी गोष्टी करण्याकडे आमचे प्राधान्य असेल. त्याशिवाय स्थानिक लोककलेलाही व्यासपीठ मिळवून देण्याचे प्रयत्न असतील. पुढील पाच वर्षात ही कामे करण्यासाठी वावरणार आहे, असे शेवटी आमदार बोरकर यांनी सांगितले.