विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने बेताल वक्तव्य : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसची पत्रकार परिषद
खानापूर : खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने आमदार अंजली निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसने आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यासाठी राजकारणाची सुपारी घेऊन आरोप करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत, आम्ही कोणत्याही शिक्षेस सिद्ध आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस मताधिक्याने निश्चित विजयी होणार यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया तालुका ब्लॉक काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, मायनॉरीटी सेलचे अध्यक्ष रियाज पटेल, चंब्बाण्णा होसमणी, जॅकी फर्नांडिस, महांतेश राऊत, मल्लेशी पोळ, सूर्यकांत कुलकर्णी, देमाण्णा बसरीकट्टी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बोलताना महादेव कोळी म्हणाले, आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्याची सूत्रे हाती घेतल्यावर तालुक्याच्या कायापालटाला सुरुवात झाली. आज तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागातही विकासाची गंगा पोहोचली आहे. खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने आरोप करताना नकळतपणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे कबूल केले आहे. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही कामाची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन असल्याने आमदारांचा हस्तक्षेपच होत नाही. हे कंत्राटदारांना माहित नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. आमदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधक धास्तावलेले आहेत. त्यामुळे राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात येत आहेत. यामागे कोणत्या तरी राजकीय शक्तीचा हात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
यावेळी रियाज पटेल म्हणाले, तालुक्यात गेल्या पाच वर्षात आमदार निंबाळकर यांच्या कार्यकाळात तालुक्यात 326 नव्या शाळाखोल्यांची निर्मिती, 275 शाळा खोल्यांच्या दुरुस्ती, 25 अंगणवाड्यांची निर्मिती, 55 अंगणवाड्यांची दुरुस्ती, ग्रामीण भागात 35 बसस्थानकांची निर्मिती, 40 समुदायभवन, आयटीआय कॉलेज, समाज कल्याण कार्यालय, देवराज अर्स भवन, एमसीएच हॉस्पिटल, महाविद्यालयाची इमारत, खानापूर नवीन बसस्थानकाची निर्मिती, इटगी प्राथमिक उपचार केंद्राची इमारत, मौलाना आझाद इंग्रजी माध्यम शाळेची इमारत, नवीन पोलीस स्थानक इमारत, हेस्कॉम नवीन इमारत, नंदगड येथे पशू वैद्यकीय दवाखाना, बिडी महाविद्यालयीन इमारत, खानापूर येथे रयत संपर्क केंद्र, आमटे येथे कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळा, आमटे हायस्कूल इमारत अशा 772 बांधकामांची पूर्तता झालेली आहे. तसेच तालुक्यात ग्रामीण व दुर्गम भागातील पक्क्या रस्त्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडून कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे. भाजप सरकारने जाणीवपूर्वक अनेक विकासकामात अडथळा निर्माण करून निधी देताना दुजाभाव करून जाणीवपूर्वक निधी मंजूर करण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच काँग्रेसचे आमदार असल्याने सरकारकडून शासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याच्या सूचना केल्या होत्या, असा आम्हास संशय आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी कोणत्याच प्रकारचे सहकार्य करत नसतानाही आमदार अंजली निंबाळकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करून विकासकामे राबविली आहेत. अद्यापही अनेक विकासकामांचे प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पडून आहेत. त्यांनी सरकारदरबारी पाठवलेलेच नाही. यामुळे देखील विकास म्हणावा तसा साध्य झालेला नाही.
आमदार अंजली निंबाळकर आणि कंत्राटदार यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसून कंत्राटदार संघटनेने केलेल आरोप हे बिनबुडाचे व हास्यास्पद आहेत. तालुक्यात विकासकामे निकृष्ट दर्जाची होत होती. तेंव्हा कंत्राटदार मूग गिळून गप्प का बसलेले? आताही त्यांनी शासनाकडे निकृष्ट कामाबद्दल व अथवा भ्रष्टाचाऱ्याबद्दल तक्रार करावी, शासन याची चौकशी करून दोषींवर कारवाई करतील. बसस्थानकाचा कंत्राटदार हा कुठल्या मतदार क्षेत्रातला आहे, हे सर्वश्रुत आहे. तसेच जलजीवन कामातही जो भ्रष्टाचार अथवा जी कामे अर्धवट पडली आहेत. त्याबाबत कारवाई करण्यासाठी आमची कुठे हरकत आहे? तसेच जेजेएम ही योजना केंद्र सरकारची असल्याने स्थानिक आमदारांचा हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही, असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.