पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, केरळच्या नागरीकांची प्रशंसा
थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
भारताच्या स्वातंत्र्याने आता ‘अमृतकाळा’त प्रवेश केला आहे. या काळात भारताला एक विकसीत राष्ट्र बनविण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे. केरळच्या नागरीकांची या संकल्पपूर्तीत महत्वाची भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे गुरुवारी केले. त्यांनी केरळमध्ये विविध प्रकल्प योजनांना चालना दिली. यात राज्यात गरीबांसाठी 2 लाख घरे निर्माण करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश असून अनेक अन्य प्रकल्प आहेत.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, हे केंद सरकारचे धोरण असून गेली आठ वर्षे त्यावर काम करण्यात आले आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तेथे विकासाचा वेग अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे. आमचे संकल्प केवळ भाषणापुरते किंवा शाब्दिक नाहीत. संकल्पांचे रुपांतर सिद्धीत करत आहोत. युवकांनी आमच्यासह रहावे, असे आवाहन त्यानी केले.
एक लाख कोटीच्या योजना
केरळसाठी केंद्र सरकारकडून 1 लाख कोटी रुपयांच्या योजना देण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांवर केंद्र सरकारच खर्च करीत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पही राज्यात आकाराला येत आहेत. विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. केरळमध्ये गरीबांसाठी जी 2 लाख घरे संमत करण्यात आली आहेत, त्यांपैकी 1 लाख 30 हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. समाजाने केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना मनःपूर्वक सहकार्य करावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.