प्रतिनिधी /फोंडा
मातृछायेच्या तळावली येथील बाल कल्याण आश्रमाचा बारावा स्थापनादिन म्हणजेच वार्षिकोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर आश्रमात वास्तव्यास असलेल्या मुलांनी विविध उपक्रम राबविले. प्रांत स्मरण व व्यायामाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात इयत्ता सातवी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱया चोवीस मुलांनी वाडी-तळावली पंचायत क्षेत्रात श्रमदान करून प्लास्टिक कचरा गोळा केला. आश्रमाचे कार्यकारी सदस्य नागेश फडते व कार्यकर्ते अमित करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रमदान करण्यात आले.
त्यानंतर फोंडय़ातील डॉ. राजेंद देव यांच्या उपस्थितीत आश्रमाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आश्रमाचे पदाधिकारी सागर साकोर्डेकर, डॉ. नूतन देव, प्राजक्ता चितळे, नागेश फडते, संचालक अरुण धर्माधिकारी, अमित करवंदे व स्वप्नील भगत हे उपस्थित होते. ग्रामदेवता महालक्ष्मी व भारत मातेचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी संगीत शिक्षक शेखर आडपईकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी भजन सादर केले. दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या राजेंद्र शर्मा, दीपक मुळगावकर, रितेश गाड व श्रीपती गडवी या चार मुलांना भेटवस्तू व रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले. बाल कल्याण आश्रमचे हितचिंतक, आश्रयदाते व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून वार्षिक उत्सवाला शुभेच्छा दिल्या.