पुणे / प्रतिनिधी :
बुलेट ट्रेन, नाणार रिफायनरी प्रकल्प, पालघरमधील प्रकल्प आणि मुंबई मेट्रो असे महत्वाचे प्रकल्प रोखणारे कोण आहेत, हे महाराष्ट्राला माहीत आहे. हे चार प्रकल्प हजारो कोटींचे असून राज्याच्या हिताचेच होते. तसेच मुंबई मेट्रोचे कारशेडचे काम थांबल्यामुळे सुमारे चार हजार कोटींचा खर्चात वाढ झाली आहे, मात्र तेच लोक आता वेदांत-फॉक्सकॉन स्थलांतराबाबत गळा काढत आहेत, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली.
पुणे जिल्ह्याच्या केंद्रपुरस्कृत योजनांची आढावा बैठक विधानभवन येथे झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अर्थमंत्री म्हणाल्या, बुलेट ट्रेन झाली, तर त्याचे श्रेय पंतप्रधानांना जाईल, यामुळे त्याचे काम रोखले होते. वेदांत-फॉक्सकॉनबद्दल विचारणाऱ्यांनी रोखणाऱ्या चार प्रोजेक्टबाबत बोलावे, असे म्हणत अर्थमंत्र्यांनी वेदांत-फॉक्सकॉनच्या स्थलांतराच्या प्रश्नाला बगल दिली. दरम्यान, कोणी काही बोलतील त्यावर मी उत्तरे द्यायला बांधील नाही, असेही त्या म्हणाल्या.
अधिक वाचा : देशात 1 ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट
महागाई रोखण्याचे प्रयत्न सुरू
सहकार चळवळीचा वापर केवळ राजकारणासाठी झाला आहे. त्यावेळी कोणीही सहकार मंत्रालय बनविले नव्हते. मात्र आम्हाला सहकार पुढे घेवून जायचा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय बनविले आहे. वाढती महागाई रोखण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. खाद्य तेल, डाळ आयात केली जात आहे. त्यामुळे त्याच्या किंमती कमी होण्यास मदत होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रुपयांची स्थिती चांगली
रुपया घसरत असल्याबद्दल त्यांना विचारले असता, रुपयाची स्थिती चांगली असल्याचे तसांगत लोहगाव विमानतळाचे पूर्ण काम मार्च २०२३ पर्यंत होणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
सर्व मतदारसंघ महत्वाचे
भाजपसाठी भारतातील सर्व मतदारसंघ महत्वाचे आहे. फक्त बारामती नाही. मी बारामतीत भाजप संघटना मजबूत करायला आली आहे. येथे भाजप संघटनेने चांगले काम केले आहे. कोविड काळात भाजपसारखे काम अन्य कोणीही केले नाही. येथे भाजपचे आमदार, कार्यकर्ते तळगाळात काम करताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.