एकीकडे कोरोनाची ब्याद टळली म्हणून अवघे जग नव्या वर्षास सामोरे जात असता दुसरीकडे चीनमध्ये मात्र कोरोनाचा नवा अवतार विध्वंसकारी रुपात प्रकटला आहे. कोविड-19 च्या नव्या लाटेने चीनमधील इस्पितळे, आरोग्य केंद्रे पुन्हा रुग्ण भरतीने ओसंडून जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक आणि आरोग्य विषयक आणीबाणी कार्यक्रम प्रमुख डॉ. मायकेल रेयन यांच्या प्रतिपादनानुसार चिनी अधिकाऱयांनी रुग्णसंख्या जरी कमी दाखवली असली तरी तेथील अतिदक्षता विभाग कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात व्यस्त झाले आहेत.
उर्वरित चीनमध्ये आणि खुद्द राजधानी बिजींगमध्ये आज इस्पितळे सर्वाधिक प्रमाणात कोरोना रुग्णांचा भरणा असलेली दिसत आहेत. 2020 पासून चीनने शून्य कोविड धोरणानुसार आरोग्यविषयक कठोर निर्बंध लादले. परंतु अलीकडच्या काळात या निर्बंधाविरोधात तेथील नागरिक रस्त्यांवर उतरल्यामुळे बरेच निर्बंध शिथील करण्यात आले. नेमकी यानंतर कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली आणि रुग्णसंख्या पाहता पाहता मोठय़ा प्रमाणात वाढली. यामुळे विशेषतः वयस्क लोक जे रोगप्रतिकार शक्तीच्या अभावामुळे सहजगत्या कोरोनाची शिकार बनू शकतात त्यांच्यात भीतीची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये नेमके काय घडते आहे हे समजणे, या देशाने अंगिकारलेल्या विशिष्ट बंदीस्तपणामुळे दुरापास्त बनले आहे. तेथील अधिकृत सरकारी संस्थांकडून कोरोनाबाबत जी माहिती दिली जाते आहे आणि प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे त्यात कमालीचा विरोधाभास पहावयास मिळतो आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना आजाराची तीव्रता, रुग्णसंख्या, मृत्यूदर, उपचार पद्धती याची सत्याधारित, निश्चित माहिती चीनने द्यावी यासाठी पाठपुरावा करीत आहे. अशा माहितीच्या अभावी चीनला मदत करणे तर कठीण जाईलच, शिवाय तेथील परिस्थिती हाताबाहेर जाता जगासही नव्या संसर्गाचा धोका निर्माण होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील संसर्गजन्य आजारतज्ञ डॉ. अँथनी फायुसी जे चीनच्या कोरोनाविषयक धोरणाचे टीकाकारही मानले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘जेव्हा तुमच्याकडे विषाणू संसर्गाची मोठी लाट निर्माण होते तेव्हा मूळ विषाणूचे अधिक धोकादायक विषाणूमध्ये रुपांतर होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते. विषाणूचे हे बदललेले रुप पूर्वीच्या औषधोपचारांवर मात करण्याची क्षमता बाळगून असल्याची शक्यता यामुळे बळावते. परिणामी, यातून जग नव्या आरोग्य विषयक संकटास सामोरे जाते. चीन हा देश आपल्या कोरोनाविषयक धोरणातून नवनव्या कोरोना विषाणूच्या अवतारास जन्म देत आहे आणि हे घातकी धोरण बदलण्यासाठी चीनवर सार्वत्रिक दबाव आणण्याची गरज आज निर्माण झाली आहे.’ डॉ. अँथनी यांचे हे मत गृहीत धरून चीनचे कोरोनाविषयक धोरण नेमके कुठे चुकले आहे याचाही परामर्श घेणे या संदर्भात अगत्याचे आहे. जगात कोविड-19 नामक नव्या व खतरनाक विषाणूने जेव्हा हाःहाःकार माजवण्यास सुरुवात केली तेव्हा या साथीपुढे अस्तित्वातील सारे आरोग्यविषयक औषधोपचार निकामी ठरू लागले. एकीकडे कोरोनाचा संपर्क झपाटय़ाने वाढतो आहे आणि दुसरीकडे त्यावर कोणतेच ठोस औषधोपचार नाहीत अशा आकस्मिक संकटात सापडलेल्या देशांनी कोरोना प्रतिबंधक सार्वत्रिक व एकात्म वैश्विक रणनिती आखण्याचा विचार न करता धायकुतीस येऊन आपल्यास योग्य वाटेल ते धोरण राबविण्यास सुरुवात केली.
काही देशांनी ज्यांना विषाणूबाधा होण्याची जोखीम अधिक गंभीर आहे त्यांच्या वैद्यकीय सुरक्षेवर अधिक लक्ष देत रोगप्रतिकारशक्ती वाढून विषाणू नामशेष होईल, असा तर्क होता. परंतु या धोरणामुळे वयस्क लोक अधिक प्रमाणात मृत्युमुखी पडले. शिवाय ज्यांची शरीर दशा संसर्ग सहन करण्याइतकी सक्षम नव्हती त्यांचेही बळी पडले. इतर काही देशांनी हा मार्ग न अवलंबता शून्य कोविड धोरण स्वीकारले. याद्वारे टाळेबंदी, सीमाबंदी, प्रवास बंदी असे कडक निर्बंध लादून कोविड-19 संसर्गास अटकाव करण्याचा आणि उपलब्ध उपचारांद्वारे संपविण्याचा प्रयत्न केला. दुसऱया बाजूने लस आयात, लस निर्मिती, सार्वत्रिक लसीकरण या उपायांचा अवलंब केला. त्याचप्रमाणे जनतेस मुखपट्टी, स्वच्छता विषयक उपाय, गर्दी टाळणे याबाबत योग्य मार्गदर्शन करून कोविड प्रतिबंधक वर्तुणुकीस प्राधान्य दिले. हे धोरण अधिक परिणामकारक ठरले. चीनने मात्र विषाणू कालांतराने स्वतःच नाहिसा होईल, या समजुतीने सार्वत्रिक लसीकरण, परिणामकारक लसींची आयात यांना फाटा देऊन टाळेबंदी, सीमाबंदी, विलगीकरण हे धोरणच कायम ठेवले. अधिक लोकांना संसर्ग होत असतानाही चीनने चाचण्या थांबवल्या. कधी संसर्ग असतानाही टाळेबंदी उठवून लोकांना नित्यकर्मांची मुभा देणे तर कधी संसर्ग नसताना टाळेबंदी करणे असे अनाकलनीय फेरबदल चिनी सरकार करीत राहिले. परिणामी, तेथील जनतेचा मोठा भाग लसीकरणापासून विन्मुख राहिला. कोरोनाचा धोका मावळला नाही, संसर्ग सातत्यामुळे नवनवे विषाणू अवतार जन्म घेत राहिले आणि परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत राहिली. त्यातही खरे दुर्दैव हे की, वादळ आले तरी वाळूत डोके खुपसून ते नसल्याचे आत्मसमाधान मिळवणाऱया शहामृगासारखी चिनी राज्यकर्त्यांची वृत्ती आणि जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही जागतिक शक्तीची चीनकडून कोरोना संदर्भातील खरी आणि संवेदनशील आकडेवारी व माहिती मिळवण्याची असमर्थता. यामुळे चीन कायमस्वरुपी कोरोना वाहक देश बनून जगावर कायमची टांगती तलवार लटकावतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
चीनमधील कोरोना साथीने आज इतर देशातही आपले प्रताप दाखविण्यास आरंभ केला आहे. कोरिया, जपान, अमेरिका इ. देशातून येणाऱया संसर्गाच्या बातम्या जगाची चिंता वाढवणाऱया आहेत. तथापि, तज्ञांच्या मते या संदर्भात जगात दुसऱया क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताची स्थिती मात्र समाधानकारक आहे. भारतात मागील जुलैपर्यंत 90 टक्क्याहून अधिक प्रौढास प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मोठय़ा संख्येने बुस्टर डोसही देण्यात आले आहेत. शिवाय मोठय़ा जन टक्केवारीस नैसर्गिक संसर्ग होऊन गेला आहे, जो समूह रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपकारक आहे. यामुळे भारतात नव्या विषाणूचे आगमन जरी झाले तरी दुसऱया लाटेत झाली तितकी प्राणहानी होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाचा झपाटा आणि त्यांनी केलेली सार्वत्रिक हानी हा इतिहास न विसरता भारतासह इतर देशांनी आपली कोरोना प्रतिबंधक आरोग्य आणि सामाजिक यंत्रणा चीनमधील नवा उद्रेक ओसरेपर्यंत अधिक सतर्क व कार्यक्षम ठेवण्याची आज खरी गरज आहे.
-अनिल आजगावकर