ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. हे बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आणि 3 जुलैला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र, आता हे अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे 3 व 4 जुलै रोजी हे अधिवेशन होईल.
रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. त्यानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यावेळी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागेल. एकनाथ शिंदे गट आता व्हिप काढून विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा व्हीप काढू शकतात. हा व्हिप जर उद्धव ठाकरे समर्थक आमदारांनी मानला नाही, तर त्यांच्या 16 आमदारांवरही निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सर्व नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव या तीन महत्त्वाच्या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
ठाकरे सरकारच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्राला विधानसभा अध्यक्ष मिळालेला नव्हता. विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडे कारभार सोपवण्यात आलेला होता. आता शिंदे सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचंही नाव चर्चेत आहे. आता यापैकी कुणाची निवड विधानसभा अध्यक्षपदी होते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.