ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
जम्मूच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याचा भाऊही जखमी झाला. या घटनेनंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र आणि लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यावर जोरदार टीका करताना ही घटना नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे आणखी एक उदाहरण असल्याचा दावा त्यानी काश्मीरमध्ये केला.
केंद्र सरकार काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले असून हिंसाचाराच्या भीतीने अजूनही काही काश्मिरी पंडीत खोरे सोडाण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप ओवेसी यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, “भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये गव्हर्नरांची नेमणूक केल्यामुळे काश्मिरमधील केंद्रशासित सरकार अयशस्वी ठरले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काहीही फायदा झालेला नाही. काश्मिरी पंडितांवर झालेला हा पहिलाच हल्ला नाही. केंद्र सरकार पंडितांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. काश्मिरी पंडितांची मानसिकता आता काश्मीर सोडाण्याची झाली आहे.” याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.