सातारा / प्रतिनिधी
“संतोष बांगर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करून हातवारे करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला भ्याड हल्ला आहे. आ. बांगर म्हणतात त्याप्रमाणे हा हल्ला म्हणता येणार नाही तर पाठीमागून येवून कोणीतरी केलेला आगावूपणा आहे अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात शंभूराज देसाई हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “संतोष बांगर आमचे विधीमंडळातील सहकारी आहेत. ते त्यांच्या खाजगी देवदर्शनासाठी कुटुंबाबरोबर जात असताना चार पाच व्यक्तींनी त्यांची गाडी अडवण्याचा, गाडीला हातवारे करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा भ्याड हल्ला आहे. आमदार बांगर यांनी सांगितल्या प्रमाणे याला हल्ला म्हणता येणार नाही. पाठीमागून येवून कोणीतरी केलेला आगावूपणा आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. पोलीस निश्चितपणाने हल्लेखोरांवर कारवाई करतील,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेत विविध मुद्यावर त्यांनी मत मांडले.