मुंबईतील व्यापारी खून प्रकरण
रत्नागिरी प्रतिनिधी
ठाणे येथील व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचा ज्या दोरीने गळा आवळला त्याच दोरीने त्याच्या मृतदेहाचे बोचके बांधले, अशी कबुली संशयितांकडून पोलिसांच्या तपासात देण्यात आली. त्यामुळे संशयितांनी कोठारीचा गळा आवळला ती दोरी गेली कुठे, या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. पोलिसांकडून गळा आवळण्यात आलेली दोरी व मृतदेह भरून ठेवलेली गोण जप्त करण्यात आली आहे. तपासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा पुरावा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
19 सप्टेंबर रोजी रात्री 8.30च्या सुमारास रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता.. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आहे. किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीत भरून रिक्षाने आबलोलीतील जंगलमय परिसरात पऱ्यात फेकून दिला.