अध्याय अठरावा
भगवंत म्हणाले, खऱया संन्याशाला ब्रह्मच संसाराच्या रूपाने साकार भासत असते. साकार काय आणि निराकार काय, खरोखर दोन्ही ब्रह्मच, असा ज्याच्या ज्ञानाचा निर्धार असतो, त्याच्या आहाराबद्दल सांगायचं झालं तर, जेव्हा काही खावयास मिळत नाही, त्या वेळेस तो दुःखी होत नाही किंवा अन्नासाठी तळमळत नाही, इतका त्याचा मनोनिग्रह बळकट असतो. तसेच उत्तम आहार मिळाला म्हणून त्याच्या मनाला हर्षही होत नाही. कारण आपल्या कर्माप्रमाणे सर्व गोष्टी असतात हे वर्म त्याला माहीत असते. तर मग तो भिक्षेसाठी तरी का हिंडतो ? याचं उत्तर असं की, आश्रमधर्म पाळण्यासाठी भिक्षेसाठी आवश्य फिरणं आवश्यक आहे. कारण आहाराशिवाय त्यांचे मन क्षीणच होत असते. संन्याशाला जर ध्यान घडले नाही, तर त्याच्या आश्रमधर्माचे तारू बुडून जाते. म्हणून आपल्या हिताकरिताच त्याला भिक्षेला जाणे भाग पडते. आहार सेवन केला असता साधकाला साधन घडते. साधन घडले म्हणजे ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीने मोक्षाचा लाभ होतो. म्हणून रुक्ष किंवा मिष्टान्न सहजी जे मिळेल, त्यानेच प्राणधारण करावे. जिव्हेची लालूच सोडून द्यावी. निद्रा किंवा आळस ह्यांचे ठाणे न बसेल अशा रीतीने प्राणधारण करावे. आसन किंवा ध्यान नीट रीतीने ठसेल अशा रीतीने खाणे, त्याचेच नाव युक्ताहार. झाडाची साल अथवा मृगचर्म, नवे किंवा जुने वस्त्र, जे सहजी मिळेल, ते आनंदाने पांघरावे.
गोधडी किंवा मऊ हांतरूण, गवताचा थर किंवा जमीन, जे काय सहज मिळेल, त्यावरच मुनी शयन करतात. मी एक भोक्ता किंवा शयनकर्ता आहे, ही अहंताही त्याला नसते. आता, स्नानादिक कृत्यांमध्येही त्याची निरभिमानताच असते. आचमन, स्नान किंवा प्रातर्विधि वगैरे करताना तो शास्त्रविधीचा किंकर बनून करीत नाही. कारण त्याच्या कर्माभिमानाचा थाराच मोडून गेलेला असतो. सारांश, मी जसा अवतारी, तसाच तोही होतो. मी जसा लीलेने अवतार धारण करून अलिप्तपणाने सर्व कर्मे करतो, त्याप्रमाणे योग्याचीही पद्धत असते. तोही सर्व कर्मे करताना अलिप्तच असतो. ज्याला भेदाचेच भान नाही, त्याच्या देहाचे पालनपोषण, स्नान, पान, खाणे, जेवणे, बसणे, जाणे, येणे तरी कसे घडणार ? आणखी एक म्हणजे, जो विकल्पाची भ्रांती जिंकून खरोखर अद्वैतस्वरूपातच मिसळला, तरी त्याच्या देहाची स्थिती व चलनवलन प्रारब्धाधीनच राहते. वृक्ष समूळ जरी उपडून पडला, तरी त्या वृक्षामध्ये ओलेपणा हा असतोच. विडा गिळून टाकला तरी तोंडाला लाली ही राहतेच किंवा कन्यादान करून दिले, नवरा नवरीला घेऊनही गेला, तरी फुकटचा मान म्हणून शिल्लक असतो आणि मरेपर्यत रुसणे आणि फुगणे काही जात नाही ! त्याप्रमाणे अभिमानाच्यामुळे मी कर्मकर्ता असे बळेच म्हणतो, ती अहंता ज्ञानाच्या बळाने नाहीशी होते. तरीही शरीर हे प्रारब्धाने चालतच असते.
कुंभार हा दांडा व मडके घेऊन जातो, तरी पहिल्या फिरविण्याने त्याचे चाक फिरतच असते. त्याप्रमाणे अभिमान नाहीसा झाला तरी, प्रारब्धाने देह चालतच असतो. त्या देहाचे पालनपोषण प्रारब्धच करते हे तू लक्षात ठेव. ज्ञात्याला खरोखर प्रपंचाचे भानच नसते. देहाजवळ जशी मिथ्यारूप छाया असते, त्याप्रमाणे ज्ञात्याला देह दिसत असतो. म्हणूनच खरोखर त्याला ‘देह हाच मी’ अशी बुद्धी उत्पन्न होत नाही. छाया ही पालखीत बसली, किंवा वि÷sवर पडलेली दिसली, तरी त्या छायेच्या अभिमानाने पुरुषाला काही त्याचे सुखदुःख होत नसते. त्याप्रमाणे देहाचा मानापमान हा सज्ञानाच्या स्थितीला मुळीच बाधक होत नाही. शेवटी प्रारब्धाचा क्षय झाला म्हणजे ते विदेहमोक्ष पावतात. पाण्याची लाट जशी समुद्रामध्ये स्थिर होते (मिसळून जाते) त्याप्रमाणे ज्ञाता माझ्यामध्येच विदेहपणाने समरसून जातो. उगम-संगम-प्रवाह असतो, तोपर्यंतच नदीच्या नामरूपाची ख्याती असते पण ती समुद्राला मिळाली की सारेच आटपते. त्याप्रमाणेच ज्ञाते माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात. क्रमशः
क्रमशः