प्रसिद्ध गायिका पद्मभूषण वाणी जयराम यांचे निधन
चेन्नई / वृत्तसंस्था
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे लोकप्रिय नाटय़गीत गाणाऱया आणि अलीकडेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 व्या वषी निधन झाले. त्यांच्या डोक्मयाला दुखापत झाल्यामुळे त्या आजारी असायच्या. याचदरम्यान शनिवारी सकाळी त्या चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांनी अलीकडेच पार्श्वगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी 18 भारतीय भाषांमध्ये 10,000 हून अधिक गाणी गायिली असून तीनवेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तसेच गेल्या आठवडय़ातच प्रजासत्ताकदिनी देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण जाहीर झाला होता.
वाणी जयराम यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उडिया, बंगाली यासह देशातील अनेक भाषांमध्ये 10 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा या राज्यांमधूनही त्यांनी राज्य पुरस्कार जिंकले. 1971 मध्ये आलेल्या ‘गुड्डी’ या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी ‘बोले रे पपी हरा’ आणि ‘हमको मन की शक्ती देना’ ही गीते गायिली होती. संगीतकार राम कदम यांनीही त्यांच्याकडून मराठी चित्रपट गीते गाऊन घेतली होती. संगीतकार वसंत देसाई यांनी त्यांना हिंदीमध्ये पहिली संधी दिली. त्यांच्या आवाजात गायलेले हे गाणे एव्हरग्रीन साँग ठरले. या चित्रपटातून जया बच्चन यांनी सिनेजगत कारकिर्दीत पदार्पण केले होते. मराठीतील ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकात कुमार गंधर्व यांच्यासमवेत त्यांनी गायिलेले ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे नाटय़गीत आजही लोकप्रिय आहे. याशिवाय वसंत देसाई यांनी त्यांच्याकडून काही मराठी अभंगही गाऊन घेतले आहेत.
1 हजारहून अधिक चित्रपटांमध्ये गायन
वाणी जयराम यांनी 1000 हून अधिक भारतीय चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची भूमिका पार पाडली. त्यांनी या क्षेत्रातील मोठय़ा आणि दिग्गज संगीतकारांसोबत काम करत एकापेक्षा एक हिट गाणी दिली. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, मद्रास वरून आपली कला सादर करत गायन क्षेत्रातील ‘श्रीगणेशा’ सुरू केला होता. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने देशातील आणि जगातील सिनेशौकिनांना मंत्रमुग्ध करतानाच अनेक स्टेज शोमध्येही आपली गायकी सादर केली. त्यांनी एम. एस. इलैयाराजा, आर. डी. बर्मन, के. व्ही. महादेवन, ओ. पी. नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह इतर प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले आहे.