ऑनलाईन टीम / तरुण भारत :
The bridge at Chandni Chowk was demolished मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या चांदणी चौकात असलेला 30 वर्ष जुना पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला. 600 स्फोटकांच्या सहाय्याने मध्यरात्री 2 वाजून 33 मिनिटांनी हा पूल पाडण्यात आला. राडारोडा हटविण्याचे काम सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तोपर्यंत या भागात संचारबंदी लागू असणार आहे.
तांत्रिक रचनेनुसार घेतलेल्या 1500 छिद्रांमध्ये 600 किलो स्फोटके पेरण्यात आली होती. अंतिम तयारी झाल्यानंतर शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली. मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला होता. ठरावीक अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच या ठिकाणी उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल हा पाडण्यात आला.
एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष मेहता यावेळी बोलताना म्हणाले, पूल पाडण्यात आम्ही 100 टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला, आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडला होता. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात. जी पद्धत ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती, त्याला impulsive ब्लास्टींग असं म्हणले जाते.